Tuesday, June 16, 2026
Latest NewsPUNE

जबाबदार आणि सुरक्षित पर्यटनावर भर द्या-जिल्हाधिकारी डॉ.सुहास दिवसे

 

पुणे : पर्यटनस्थळांवर पर्यटकांच्या सुरक्षेच्यादृष्टीने आवश्यक उपाययोजना करून याठिकाणी कोणतीही जीवित हानी होणार नाही याची दक्षता विविध यंत्रणांनी घ्यावी. जबाबदार आणि सुरक्षित पर्यटनावर अधिक भर द्यावा, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.सुहास दिवसे यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात दूरदृष्य प्रणालीद्वारे आपत्ती व्यवस्थापनाबाबत आयोजित बैठकीत ते बोलत होते. बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी विठ्ठल बनोटे आदी उपस्थित होते.

डॉ.दिवसे म्हणाले, येत्या काळात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर अपघात प्रवण क्षेत्रांची माहिती एकत्रित करावी. दरडी कोसळणे, पूल पाण्याखाली जाणे अशा घटनांची शक्यता असलेल्या ठिकाणची वाहतूक वेळीच बंद करावी. पर्यटनाच्यादृष्टीने धोकादायक ठिकाणी पर्यटकांना बंदी करावी. कोणतेही पर्यटक सायंकाळनंतर वनक्षेत्रात राहणार नाही याची दक्षता घ्यावी. पर्यटकांकडून नियमांचे पालन होईल याकडे विशेष लक्ष द्यावे. कृषी पर्यटन केंद्रावरही सुरक्षेच्या नियमांचे पालन होईल यादृष्टीने सूचना द्याव्यात.

प्रेक्षणीय ठिकाणी गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी उपाय योजावेत. गडकिल्ले आणि वनक्षेत्रात पर्यटन व्यवसाय करणाऱ्या संस्थांकडून त्यांच्या समवेत येणाऱ्या पर्यटकांची माहिती घ्यावी. अशा ठिकाणी सुट्टीच्या दिवशी बचाव पथके तयार करण्यासाठी स्थानिक स्वयंसेवी संस्था आणि पथकांची मदत घ्यावी. त्यांना आवश्यक साधनसामुग्री द्यावी. एनडीआरएफच्या संपर्कात राहून कोणतीही जीवित हानी होणार नाही याची दक्षता घ्यावी. मावळ, मुळशी, भोर, वेल्हा यासह ग्रामीण भागात सर्पदंशाच्या लशी उपलब्ध असल्याबाबत खात्री करावी. जिल्हा आणि तालुका स्तरावर २४ तास नियंत्रण कक्ष सुरू ठेवावे.

रस्ता सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात. अनधिकृत जाहिरात फलकाचे सांगाडेही तात्काळ दूर करावेत. महापालिका क्षेत्रात जुन्या इमारती, पूरप्रवण क्षेत्र आणि वाहतुकीच्यादृष्टीने अडचणीच्या क्षेत्रांची माहिती घ्यावी आणि त्याठिकाणी आवश्यक उपाययोजना निश्चित कराव्यात. जलाशयात मासेमारीसाठी बोटींना परवानगी दिली असल्यास या बोटींचा पर्यटन किंवा प्रवासासाठी उपयोग होणार नाही याची दक्षता घ्यावी. सर्व यंत्रणांनी जीवित हानी रोखण्याचा संकल्प करावा, असे आवाहन डॉ.दिवसे यांनी केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading