Tuesday, June 16, 2026
Latest NewsPUNE

भारतात श्रवण यंत्रांची मोठया प्रमाणात गरज – अनुराधा पौडवाल

पुणे : आपल्याकडे लहान मुलांनी ऐकू न येणे किंवा बोलता न येणे यामुळे ते हतबल होऊ नये, हीच प्रार्थना आमची गणरायाचरणी आहे. मुलांना ऐकायला येत नसेल, तर त्याचे कारण पालकांनी शोधणे गरजेचे आहे. तसेच मूल जन्माला आल्यानंतर इतर तपासण्यांसोबतच श्रवण तपासणी देखील गरजेची आहे. एकीकडे जागतिक कर्णबधिर दिन साजरा होत असतानाच दुसरीकडे भारतात श्रवणयंत्रांची मोठया प्रमाणात गरज असल्याचे प्रख्यात गायिका पद्मश्री डॉ.अनुराधा पौडवाल यांनी सांगितले.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे आणि सूर्योदय फाऊंडेशन, मुंबई आणि ओएनजीसी कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने नवीन मराठी शाळेत झालेल्या कार्यक्रमात तब्बल २२० हून अधिक रुग्णांना श्रवण यंत्राचे वाटप करण्यात आले. यावेळी ओएनजीसी कंपनीचे चिफ जनरल मॅनेजर एन.सी.बलियारसिंग, डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या ज्येष्ठ शिक्षीका तनुजा तिकोने, प्रतिभा पाखरे, भाग्यश्री हजारे, श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, डॉ.संजीव डोळे, राजाभाऊ घोडके, विलास रासकर, ज्ञानेश्वर रासने, मंगेश सूर्यवंशी, राजाभाऊ पायमोडे आदी उपस्थित होते.

अनुराधा पौडवाल म्हणाल्या, लहान मुलांना ऐकायला येत नाही, हे पालकांना लवकर कळत नाही. त्यामुळे याविषयी जनजागृती करण्याकरिता जागतिक कर्णबधिर दिनाच्या निमित्ताने हा उपक्रम राबविण्यात आला आहे. जी मुले आर्थिकदृष्टया दुर्बळ आहेत, त्यांना विनामूल्य श्रवणयंत्र दिले जात आहे. मुलांना ऐकायला येत नसेल तर ती केवळ ऐकू शकत नाहीत, असे नाही तर यामुळे अनेक मुले बोलायला देखील शिकत नाहीत. त्यामुळे याकडे लक्ष देऊन श्रवणयंत्र विनामूल्य उपलब्ध करुन देण्याकरिता दानशूरांनी पुढे यायला हवे.

महेश सूर्यवंशी म्हणाले, दगडूशेठ गणपती ट्रस्ट व सूर्योदय फाऊंडेशनच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम होत आहे. ट्रस्टच्या कार्यालयात ८०० हून अधिक रुग्णांची नोंदणी झाली असून अजूनही नोंदणी सुरु आहे. सूर्योदय फाऊंडेशनच्या माध्यमातून गायिका अनुराधा पौडवाल याविषयी जनजागृती करीत आहेत, हे खूप मोठे काम आहे. केवळ पुण्यातच नाही, तर इतरही शहरात या उपक्रमाला मोठा प्रतिसाद मिळत आहे. यावरुनच समाजातील मोठी व्यथा समोर येत असल्याचे दिसून आले आहे. आजच्या शिबीरात या मुलांना यंत्रा सोबत ८ ते ९ महिने पुरतील इतके सेल देखील दिले जात आहेत. अनुराधा पौडवाल यांच्या पुढाकाराने दर दोन ते तीन महिन्यांनी अशीच शिबीरे आयोजित करुन मदत केली जाईल, असेही त्यांनी सांगितले. राजाभाऊ घोडके यांनी सूत्रसंचालन केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading