मराठा आरक्षण न टिकवण्यासाठी समितीच जबाबदार – पंकजा मुंडे
सातारा : राज्यात पंकजा मुंडे यांची शिवशक्ती परिक्रमा सुरू आहे. त्यांचे फलटण येथे गुरुवारी आगमन झाले. या वेळी भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी त्यांचे जंगी स्वागत केले. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. अंतरवाली सराटी (ता. अंबड) येथे मराठा आंदोलकांबाबत जो प्रकार झाला त्या घटनेची निःपक्षपातीपणे चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. तसेच त्या म्हणाल्या की, मराठा आरक्षण न टिकवण्यासाठी समितीच जबाबदार आहे. मराठा आरक्षणाबाबत आम्हाला आमचे मत विचारण्यापेक्षा आरक्षणासाठी जी समिती आहे, त्यांना यावर त्यांचे मत विचारा, असे त्या म्हणाल्या.
पंकजा मुंडे म्हणाल्या की, मराठा समाजाच्या आरक्षणाला या समितीने जो मसुदा तयार केला तो जबाबदार आहे. जर तो मसुदा नीट असेल, तर मराठा समाजाला शंभर टक्के आरक्षण देता येईल, मराठा आरक्षणाबाबत माझ्यासह मंत्री छगन भुजबळ, विजय वडेट्टीवार, नाना पटोले, चंद्रशेखर बावनकुळे यांचे मत ठाम आहे. त्यामुळे आम्हाला आमचे मत विचारण्यापेक्षा याबाबत संबंधित कमिटीला का विचारत नाही, असा सवाल त्यांनी केला.
