चांदणी चौकातील उड्डाणपुलाला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव द्या – संभाजी ब्रिगेड
पुणे : शहराची ओळख छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने आहे. बारा मावळातील सर्व मावळे सोबत घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची निर्मिती केली. मावळ्यांच्या कर्तुत्वाचा इतिहास पुण्यासह महाराष्ट्राने, देशाने पाहिला आहे. अशा कर्तुत्वान राजाचा, छत्रपतींचा इतिहास हीच पुण्याची ओळख आहे. म्हणून चांदणी चौकाला अर्थात चांदणी चौकातील उड्डाण पुलाला ‘छत्रपती शिवाजी महाराज’ यांचे नाव द्यावे… अशी मागणी राज्य सरकार व पुणे महानगरपालिकेकडे संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक संतोष शिंदे यांनी केली आहे.
केंद्रीयमंत्री मा. नितीन गडकरी साहेब, मुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस साहेब, मा. अजित दादा पवार साहेब व पालकमंत्री मा. चंद्रकांत दादा पाटील साहेब यांच्या व अन्य नेतृत्वाच्या उपस्थितीत या चांदणी चौकातील उड्डाणपूलाचे उद्घाटन होणार आहे. परंतु या पुलाला कुणाचेही नाव देण्यात आलेलं नाही. एक शिवप्रेमी मावळे म्हणून आमची विनंती आहे की, या उड्डाणपुलाला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव देऊन शिवरायांच्या विचारांचा गौरव करावा…
या मागणीसाठी संभाजी ब्रिगेडच्या वतीने आम्ही पुणे महानगरपालिका, जिल्हाधिकारी व महाराष्ट्र सरकारकडे लेखी पत्र देऊन पाठपुरावा करणार आहोत.
