Wednesday, May 6, 2026
Latest NewsPUNE

महागाईमुळे जेवण बनले बेचव; रोज एकदाच जेवायचे हे व्रत घ्यावे लागेल? – मोहन जोशी

पुणे : महागाईच्यामुळे जनतेचे जेवण आता बेचव बनले असून, रोज एकदाच जेवायचे असे व्रत मोदी राजवटीत जनतेला घ्यावे लागेल काय, असा प्रश्न आता पडला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचे भाजपा सरकार मात्र महागाई बाबत तोंड, डोळे आणि कान बंद करून बसले आहेत. ते केवळ त्यांचे फोटो माध्यमात छापून यावेत, चॅनल्सवर रोज दिसावे आणि तासंतास निरर्थक भाषणे करीत राहावे यातच दंग आहेत. त्यामुळेच चिरडीला आलेली जनता आता निवडणुकीची वाट बघत असून मतदानातून निष्क्रिय मोदी सरकारला ते धडा शिकवल्या शिवाय राहणार नाहीत असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी केले.

मोहन जोशी म्हणाले की, जागतिक क्रुडऑइलच्या किमती ११२ डॉलर्सवरून ६५-७० डॉलरपर्यंत खाली आल्या आहेत, तरीही देशातील पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी न करता मोदी सरकारने जनतेची लूट चालू ठेवली आहे. ३ प्रमुख ऑइल कंपन्यांना तब्बल 1 लाख कोटी रुपयांचा नफा होत आहे. कॉंग्रेसचे पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांच्या कार्यकाळात क्रुडऑइलच्ये दर ११२ डॉलर्स एवढे वाढले तरीही सबसिडी देऊन त्यांनी पेट्रोल व डिझेलचे भाव ६० ते ७० रुपये एवढे कमी ठेवले होते. आता तर क्रुडऑइलच्या किमती ६५-७० डॉलर्स एवढ्या कमी झाल्या आहेत. त्यामुळे सबसिडी न देताही पेट्रोल व डिझेलचे दर ६५ रुपयेपर्यंत ठेवणे सहज शक्य आहे. मात्र मोदी सरकारला हे शक्य असूनही ते असे करीत नाहीत याबद्दल जनतेत आता चीड निर्माण झाली आहे.

ते पुढे म्हणाले की, गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी, साखर, तेल, तूप त्याबरोबरच मसाल्याचे पदार्थ, सर्व प्रकारच्या भाज्या, डाळी, साबुदाणा, पोहे, खोबरे अशा प्रत्येकच जीवनावश्यक वस्तूंचे भाव दुप्पट अथवा तिप्पट वाढून गगनाला भिडले तरीही कुंभकर्णाप्रमाणे झोपलेल्या मोदी सरकारला जाग येत नाही. भाजपच्या कोणाही खासदार, आमदार, नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या तोंडातून महागाईबाबत म्हणजेच मोदी विरोधात ब्र देखील उच्चारला जात नाही. याबद्दलही जनतेत चीड निर्माण झाली आहे.

त्यामुळेच आता भाजपसारख्या पक्षाला मतदान करणाऱ्यांनादेखील मोदी सरकार सत्तेतून दूर करावे तरच ‘अच्छे दिन’ येतील असे वाटू लागले आहे. ‘इंडिया’ या विरोधी पक्षांच्या आघाडीने महागाई विरुद्ध रणशिंग फुंकले असून जनतेने त्यास साथ द्यावी आणि प्रत्येक वेळी पेट्रोल / डिझेल भरताना अकार्यक्षम मोदींमुळे जास्त दर द्यावा लागत आहे याची आठवण ठेवावी असे आवाहन मोहन जोशी यांनी शेवटी केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading