एनआरडीसीच्या वतीने राष्ट्रीय बौद्धिक संपदा महोत्सव संपन्न
पुणे: भारत सरकारच्या वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन विभागाच्या अंतर्गत राष्ट्रीय संशोधन विकास महामंडळाच्या वतीने आघारकर रिसर्च इन्स्टिटयूटमध्ये राष्ट्रीय बौद्धिक संपदा महोत्सवांतर्गत कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. उत्पादने, नाविन्यपूर्ण कल्पना आणि अविष्कारांना ‘कायदेशीर मालकी’ प्रदान करणे याबाबत कार्यशाळेत माहिती सांगण्यात आली.
कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी एनआरडीसी संचालक शेखर मुंदडा, एआरआयचे निर्देशक डॉ. प्रशांत ढाकेफाळकर, वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. सुजाता चकलोनोबीस, डॉ. संजीव मजुमदार, व्हि.सी.शुक्ला तसेच इंडस्ट्री पार्टनर म्हणून उमेश कांबळे उपस्थित होते.
शेखर मुंदडा म्हणाले, एनआरडीसीला अनेक काळ दुर्लक्ष करण्यात आले. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनानंतर संशोधनाला आणि पेटंटला महत्त्व मिळू लागले. एमएसएमई उद्योजक, विद्यार्थी, संशोधक यांना पेटंटचे महत्त्व कळू लागले आहे.रसायन मुक्त शेती करण्यासाठी एनआरडीसीचे महत्त्व आहे. संशोधकांनी शेतीशी संबधीत आणि गाईच्या अनुषंगाने संशोधन करायला हवेत. असेही त्यांनी सुचविले. यामध्ये स्टार्टअपला सहाय्य करण्यासाठी एनआरडीसी प्रयत्न करत आहे. असेही त्यांनी सांगितले.
उमेश कांबळे म्हणाले, भारताला विश्वगुरु बनविणे आणि आत्मनिर्भर भारताची निर्मिती करणे हे आपले स्वप्न आहे. नविन तंत्रज्ञान विकसित करण्यामुळे आणि संशोधनाच्या पेटंट मुळे हे स्वप्न साकार होऊ शकते. मागच्या १० वर्षात पेटंटचे प्रमाण वाढले आहे. त्याचप्रमाणात उद्योजक वाढले पाहिजे म्हणजे आर्थिक विकास वेगात होईल. सगळ्या उद्योजकांनी नविन तंत्रज्ञानाचा वापर करा, काही अडचणीं येत असतील तर आम्ही मदत करु असेही त्यांनी सांगितले.
भागधारकांना पेटंट, कॉपीराइट, ट्रेडमार्क, भौगोलिक संकेत (जीआय), डिझाइन संबंधित बौद्धिक संपदा अधिकार आणि त्याच्याशी संबंधित माहिती सांगण्यासाठी पेटंट ऑफिस मधून सागर पोळ, तसेच डीएसआयआरच्या डॉ.सुजाता आणि डॉ. शुक्ला यांची व्याख्याने झाली. तसेच अनेक अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि तंत्रे आहेत हे लक्षात घेऊन त्यांच्या डिझाइन आणि ट्रेडमार्क इत्यादींशी संबंधित आयपीआर संबंधित माहिती देखील देण्यात आली.
भौगोलिक संकेतचे एक्स्पर्ट गणेश हिंगमिरे यांनी जीआयचे महत्व आणि त्यामधून स्थानिक कारागिरांना मिळणारा रोजगार यासंबंधी माहिती दिली.
एनआरडीसीच्या पुणे ऑफिसचे प्रमुख डॉ.मनजीत लाड यांनी एनआरडीसीच्या इथून पुढील वाटचाली संदर्भात माहिती दिली आणि सर्व उपस्थितांचे आभार व्यक्त केले.
