पुण्यातील मंडळांच्या कार्यकर्त्यांचा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मदतीचा हात
पुणे : ‘गरजू-गरीब विद्यार्थ्यांना एक हात मदतीचा’ या उपक्रमाअंतर्गत वेल्हा तालुक्यातील अतिदुर्गम भागातील शालेय विद्यार्थ्यांना पुण्यातील साईनाथ मंडळ ट्रस्ट, गुरुवार पेठेतील वीर शिवाजी मित्र मंडळ आणि भवानी पेठ येथील शिवाजी मित्र मंडळातर्फे शैक्षणिक तसेच क्रीडा साहित्याचे वाटप करण्यात आले.
वेल्हा तालुक्यातील १८ गाव मावळमधील जिल्हा परिषदेच्या कोलंबी, नाळवट, कुसारपेर व गेळगाणी या प्राथमिक व माध्यमिक शाळेतील मुलांना स्कूल बॅग, वह्या, ड्राँईग बुक, खेळाचे साहित्य तसेच छत्री देण्यात आली.
साईनाथ मंडळ ट्रस्टचे अध्यक्ष पियुष शहा, वीर शिवराज मित्र मंडळाचे किरण सोनिवाल, शिवाजी मित्र मंडळाचे सुधीर आतुलवार, अध्यक्ष प्रल्हाद थोरात, कनी महिला मंडळाच्या कल्याणी कदम तसेच कोलंबी ग्रुप ग्रामपंचायतीच्या लोकनियुक्त संरपंच शीतल अंकुश कोडितकर यांच्या उपस्थितीत शालेय साहित्य भेट देण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नाळवट शाळेतील शिक्षक तानाजी पाटील यांनी केले, स्थानिक रहिवासी अशोक भुरूक व इतरांनी मंडळांच्या उपक्रमांचे कौतुक करून आभार व्यक्त केले. शिक्षणाचे महत्त्व सांगत आपल्या शिक्षणा करीता मंडळ नेहमी सहकार्याचा हात पुढे करत राहील असे पियुष शहा यांनी मनोगत व्यक्त करताना उपक्रमाची माहिती दिली.
