Monday, May 25, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNE

एकदिवसीय रमाई साहित्य संमेलनाचे ३० मे रोजी आयोजन

 

संमेलनाच्या अध्यक्षपदी रमणी सोनवणे यांची निवड

पुणे : महामाता रमाई भीमराव आंबेडकर राष्ट्रीय स्मारकाच्या वतीने महामाता  रमाई भीमराव आंबेडकर यांच्या ९१ व्या स्मृतिदिनानिमित्त तसेच स्मारकाच्या ८ व्या वर्धापन दिनानिमित्त शनिवार, दि. ३० मे २०२६ रोजी एकदिवसीय ‘रमाई साहित्य संमेलन’ आयोजित करण्यात आले असून या संमेलनाच्या अध्यक्षपदी विद्रोही कवयित्री,लेखिका, व्याख्याती,अभिनेत्री रमणी सोनवणे यांची निवड करण्यात आल्याची माहिती या संमेलनाचे मुख्य समन्वयक विठ्ठल गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी ॲड. नितीन घोडके, ॲड. क्षितिज खरात, संजोग कांबळे, माजी नगरसेविका लाताताई राजगुरू, श्रीमंत कोतले  भंते हर्षवर्धन, शैलेन्द्र मोरे आदि मान्यवर उपस्थित होते. 

संमेलनाची अधिक माहिती देताना विठ्ठल गायकवाड म्हणाले,  कार्यक्रमाची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर व रमाई आंबेडकर यांना पुष्पहार अर्पण करून होईल. त्यानंतर सर्वधर्म प्रतिनिधींच्या उपस्थितीत वाडिया कॉलेज शेजारील रमाई राष्ट्रीय स्मारक येथे उद्घाटन समारंभ पार पडणार आहे.

सकाळी ‘मी राजगृहातील  रमाई बोलते’ हा एकपात्री कार्यक्रम सादर करण्यात येणार असून प्रा. रमणी सोनवणे  (पुणे) या कार्यक्रमाचे सादरीकरण करणार आहेत. दुपारच्या सत्रात  रमाई आणि भीमराव यांच्या लेकरांचे कवी संमेलन होणार आहे. यामध्ये लोककवी भगवान धेंडे व इतर कवी सहभागी होणार आहेत.

सायंकाळच्या सत्रात साहित्य संमेलनाध्यक्ष प्रा. रमणी सोनवणे  यांचे अध्यक्षीय भाषण, ठराव वाचन, विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान व्यक्तींचा गुणगौरव, तसेच ‘आम्ही भारताचे लोक आंबेडकरी सांस्कृतिक चळवळ’ यांच्या वतीने कविता, गझल व गीत गायनाचा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. स्वरांजली संगीत समूहाकडूनही विशेष गीत-संगीत रजनी सादर होणार आहे.

पहिल्या रमाई साहित्य संमेलन  अध्यक्षपदी निवड झालेल्या   प्रा.रमणी सोनवणे या विद्रोही कवयित्री, लेखिका, व्याख्याती, अभिनेत्री, माणूसपणाच्या समतावादी चळवळीच्या कार्यकर्ती आहेत. त्यांचे  शिक्षण एम. ए. नेट पॉलिटिकल सायन्स असून सध्या त्या मॉडर्न कॉलेज ऑफ आर्ट्स सायन्स अँड कॉमर्स येथे कार्यरत आहेत. वयाच्या १६ व्या वर्षांपासून चळवळीत अभिनय, लेखन, कवितांच्या माध्यमातून मनपरिवर्तन आणि महामाता, महापुरुष सर्व समाज स्तरांपर्यंत पोहचवण्याचे काम करत आहेत.  सावित्रीबाई फुले, होय मी राजगृहातील रमाई बोलतेय,  मी तुमची राजमाता जिजाऊ आदि एकपात्रीचे त्या सादरीकरण करत असतात. गोरगरीब मुलांसाठी मोफत शिकवणी, स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांना मराठी, राज्यशास्त्र व  आंतरराष्ट्रीय राजकारण आणि समाजशास्त्र या विषयांचे  मार्गदर्शन त्या करत असतात असेही गायकवाड यांनी सांगितले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading