उपेक्षित साहित्यिकांच्या साहित्यावर परिसंवाद घडवून आणावेत – भारत सासणे
पुणे : युवा पिढी मराठी साहित वाचनापासून दूर जात असल्याचे निरिणातून दिसून आले आहे. युवा पिढीला मराठी साहित्याकडे आकर्षित करण्याबरोबच उपेक्षित साहित्यिकांच्या साहित्यावर परिसंवाद घडवून आणावा, कर्तृत्ववान साहित्यिकांच्या साहित्यावर प्रकाश टाकावा, शंभर वर्षातील दिवाळी अंकांचा अभ्यास करून बदलत्या समाजाचे तसेच साहित्याचे सूत्र पुणे विद्यापीठ मराठी अभ्यास मंडळाने समाजासमोर मांडावे, अशी सूचना ज्येष्ठ कथाकार, मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष भारत सासणे यांनी केली.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ मराठी अभ्यास मंडळाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल रंगत-संगत प्रतिष्ठानतर्फे डॉ. संदीप सांगळे यांचा सासणे यांच्या हस्ते एका विशेष सोहळ्यात सन्मान करण्यात आला. त्या वेळी सासणे बोलत होते. रंगत-संगत प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड. प्रमोद आडकर, मैथिली आडकर, प्रज्ञा महाजन व्यासपीठावर होते.
डॉ. सांगळे यांच्या कष्टाचे कौतुक करून सासणे म्हणाले, सकारात्मक विचार हे जीवनातील चांगले सूत्र आहे. गुणांची पारख करून रंगत-संगत प्रतिष्ठानेने घडवून आणलेल्या सत्काराबद्दल आयोजकांचेही त्यांनी कौतुक केले.
सत्काराला उत्तर देताना डॉ. सांगळे म्हणाले, अध्यक्षपदी निवड झाल्याने जबाबदारी अधिक वाढली आहे, कारण पुणे विद्यापीठ जे निर्णय घेते त्याचे अनुकरण महाराष्ट्रातील इतर विद्यापीठे करतात. मराठी साहित्याला दिशा देण्यासाठी नक्कीच सकारात्मक पावले उचलली जातील.
कार्यक्रमाच्या उत्तरार्धात रंगत संगत प्रतिष्ठानच्या काव्य विभागातर्फे ‘मल्हारधून’ हा काव्य वाचनाचा कार्यक्रम झाला. काव्यातून रसिकांनी पावसाच्या अनेख छटा अनुभवल्या. ‘मल्हारधून’ कार्यक्रमात बंडा जोशी, मीरा शिंदे, प्रभा सोनवणे, वर्षा बेंडिगेरी-कुलकर्णी, वासंती वैद्य, स्वप्निल पोरे, अजय जोशी, मिलिंद शेंडे, बबन धुमाळ, सीताराम नरके, डॉ. मृदुला कुलकर्णी, आरुषी दाते, उर्मिला वाणी, प्राजक्ता वेदपाठक, शुभदा शिरोडे, प्राजक्ता पटवर्धन, तनुजा चव्हाण यांचा सहभाग होता.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तनुजा चव्हाण यांनी केले.
