मानसिक गुलामगिरीतून मुक्त होणे हेच अण्णाभाऊंना अभिवादन – सुभाष वारे
पुणे, दि. ९ – पाप-पुण्याच्या संकल्पनेवर आधारित कर्मविपाकाचा सिध्दांत नाकारुन मानसिक गुलामगिरीतून सर्वांनी मुक्त होणे हेच लोकशाहीर कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांना त्यांच्या जन्मशताब्दी वर्षात योग्य अभिवादन ठरेल असे प्रतिपादन ज्येष्ठ समाजवादी नेते सुभाष वारे यांनी केले. दलीत स्वयंसेवक संघ आणि अण्णाभाऊ साठे स्मारक संस्था यांच्या वतीने अण्णाभाऊंच्या जन्मशताब्दी वर्षानिमीत्त आयोजित 361 व्या व्याख्यानात सुभाष वारे बोलत होते.

अध्यक्षस्थानी संघाचे संस्थापक दादासाहेब सोनवणे हे होते. सुभाष वारे पुढे म्हणाले की सर्व प्रकारचे निरर्थक कर्मकांड टाळत पूरोहितशाहीला नकार देणे व दैववादापेक्षा प्रयत्नवादाने आपले आयुष्य घडविण्याचा निर्धार आज करुया. जन्माला आलेल्या प्रत्येक व्यक्तीला चांगले शिक्षण मिळावे, प्रत्येकाच्या हाताला रोजगार मिळावा आणि यातूनच प्रत्येकाला सन्मानाने जगण्याचा अधिकार मिळावा यासाठी काम करत रहाणे हे अण्णाभाऊंच्या विचारांना पुढे नेणारे काम आहे. आरक्षण हा शोषित जातीवर्गाचा अधिकार आहे पण सामाजिक न्यायाची संकल्पना केवळ आरक्षणापुरती मर्यादित न ठेवता कौशल्य विकास व स्वयंरोजगारातून आर्थिक विकास यासाठी पण आपण आपले अधिकार मिळवले पाहिजेत. त्याचबरोबर खाजगीकरणामुळे सरकारी नोकऱ्या कमी होत असल्याने आरक्षणाचे धोरणाला सुरुंग लागत असल्याने अण्णाभाऊंना मानणाऱ्यांनी खाजगीकरणाच्या धोरणाला विरोध केला पाहिजे.
