Wednesday, August 26, 2026
Latest NewsPUNE

राजपूत महिलांच्या शौर्य, त्यागाची परंपरा आजही प्रेरणादायी -महापौर मंजुषा नागपूरे

पुणे : राजपूत महिलांची परंपरा ही केवळ गृहकृत्यांपुरती मर्यादित नसून त्याग, शौर्य, देशभक्ती आणि संस्कारांची प्रेरणादायी परंपरा आहे. आधुनिक काळातील राजपूत महिला शिक्षण, समाजसेवा, व्यापार आणि राजकारणासह विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देत आहेत. ज्याप्रमाणे श्रावणातील सरी धरतीला हिरवाईने नटवतात, त्याचप्रमाणे देशातील महिला जिथे जातात, तिथे आपल्या संस्कार आणि संस्कृतीच्या माध्यमातून समृद्धी घेऊन येतात. या सांस्कृतिक वारशाचे जतन करत महिलांच्या शिक्षण, स्वावलंबन आणि सक्षमीकरणासाठी सातत्याने प्रयत्नशील असेल, असे मत महापौर मंजुषा नागपूरे यांनी व्यक्त केले.

समस्त राजपूत महिला संघ, पुणेच्या वतीने सावन मिलन कार्यक्रमात क्षत्राणी सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार श्वेता महाले-पाटील, उत्तर प्रदेशच्या माजी महिला कल्याण मंत्री स्वाती सिंह, लोकसंगीत साम्राज्ञी कोकीला मिश्रा, गुजरातच्या अनंत श्रीविभूषित श्री श्री १००८ महामंडलेश्वर मनीषा नंदगिरी, संघाच्या अध्यक्षा मीनल यज्ञदत्तसिंह हजारे, उपाध्यक्षा पूनम परदेशी, कार्याध्यक्षा अंजली परदेशी, संगीता कुंदावला, सरिता कनोजिया व सर्व सहयोगी महिला आदी उपस्थित होते. यावेळी आमदार श्वेता महाले-पाटील, वैजापूरच्या महिला मोर्चा सचिव शिल्पा परदेशी, पत्रकार प्रभा सिंह, तलवारबाजी प्रशिक्षिका सोनलबा पढीयार, हास्य-व्यंगकार वर्षा राव यांचा सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमात राजपूत महिला पारंपरिक वेशभूषेत उपस्थित होत्या. यावेळी महिलांनी तलवारबाजीचे प्रात्यक्षिक सादर केले, तर राजपूती पारंपरिक घूमर नृत्याने कार्यक्रमात रंगत आणली.

श्वेता महाले-पाटील म्हणाल्या, महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात राजपूतांची संख्या आहे. ‘वीर शिरोमणी महाराणा प्रताप आर्थिक विकास महामंडळ’ स्थापन करण्यासाठी केलेला पाठपुरावा तसेच चिखली येथे राजपूत समाज सभागृहासाठी जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल केलेला हा सन्मान माझ्यासाठी महत्त्वाचा आहे. यापुढे देखील राजपूत समाजाच्या समस्या सरकारपुढे मांडून वंचितांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करीन, असेही त्यांनी सांगितले.

स्वाती सिंह म्हणाल्या, आपली न्यायव्यवस्था अतिशय संथ गतीने कार्यरत आहे. त्यामुळे लहान मुलींपासून ज्येष्ठ महिलांपर्यंत प्रत्येक महिलेला आज स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण देणे गरजेचे आहे. महिलांनी आत्मनिर्भर होणे ही काळाची गरज आहे. मुलींच्या हातात केवळ बाहुली देण्यापेक्षा त्यांना स्वसंरक्षणाचे धडे आणि आवश्यक कौशल्ये द्या. त्यांना शृंगार करायला शिकवण्यापूर्वी स्वतःचे रक्षण करण्यास सक्षम बनवणे अधिक महत्त्वाचे आहे, असेही त्यांनी सांगितले.

मीनल हजारे म्हणाल्या, महिलांनी एकत्र यावे, एकमेकींशी संवाद साधावा आणि आपल्या अनुभवांची देवाणघेवाण करावी, या उद्देशाने ‘सावन मिलन’चे आयोजन करण्यात आले. अशा सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून महिलांचे प्रबोधन होण्याबरोबरच आपल्या समृद्ध परंपरा, संस्कृती आणि संस्कारांचे जतन व्हावे, ही या उपक्रमामागील प्रमुख संकल्पना आहे. आधुनिकतेचा स्वीकार करताना आपल्या संस्कृतीशी असलेली नाळ कायम जोडलेली राहावी आणि पुढील पिढीलाही या वारशाची ओळख व्हावी. अशा उपक्रमांचे आयोजन आमची संस्था गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने करत आहे, असेही त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading