अनुसूचित जाती उपवर्गीकरणाला तीव्र विरोध; ३० जून रोजी मुंबईत विधानसभेला घेराव घालणार
पुणे: अनुसूचित जातीच्या (SC) ‘अ, ब, क, ड’ उपवर्गीकरणाच्या मुद्द्यावर राज्यातील दलित समाजात तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. या संदर्भात ‘बार्टी’ (डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था) कडे आतापर्यंत सुमारे ८० हजार ई-मेल प्राप्त झाले असून, त्यापैकी ८५% म्हणजेच ६५ ते ७० हजार ई-मेल हे या उपवर्गीकरणाच्या विरोधात आहेत. या पार्श्वभूमीवर, अनुसूचित जाती उपवर्गीकरण पुनर्विलोकन समितीचे राहुल डंबाळे यांनी विशेष मोहीम राबवून उपवर्गीकरणावर तीव्र आक्षेप नोंदविले आहेत. आता हा लढा अधिक तीव्र करण्यासाठी ३० जून रोजी मुंबई येथे विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान विधानसभेला घेराव घालण्याचे आंदोलन पुकारण्यात आले आहे.
३० जून रोजी मुंबईत होणाऱ्या या महा-घेराव आंदोलनाच्या पूर्वतयारीसाठी पुनर्विलोकन समितीच्या वतीने सध्या संपूर्ण महाराष्ट्रभर नियोजनाच्या बैठका सुरू आहेत. गाव, तालुका आणि जिल्हा पातळीवर समाजबांधवांना एकत्र करून या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले जात आहे. या बैठकांना राज्यभरातून मोठा प्रतिसाद मिळत असून आंदोलनाची जय्यत तयारी सुरू आहे.
विशेष मोहिमेला ७० हजार ई-मेलचा पाठिंबा
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर राज्य सरकारने उपवर्गीकरणाचा अभ्यास करण्यासाठी समिती गठित करून जनतेकडून हरकती व सूचना मागविल्या होत्या. राहुल डंबाळे यांच्या नेतृत्वाखाली राबविलेल्या विशेष मोहिमेमुळे अवघ्या काही दिवसांत बार्टीकडे हजारो आक्षेप नोंदवले गेले. एकूण आलेल्या ई-मेलपैकी ८५ टक्के जनतेने उपवर्गीकरणाच्या विरोधात कौल दिला आहे, जेणेकरून समाजाचा या निर्णयाला किती मोठा विरोध आहे हे स्पष्ट होते.
