दाम्पत्यांमध्ये मतभेद अन् 39 दिवसांत घटस्फोट
पुणे : वैचारिक मतभेद आणि स्वभावातील विसंगतीमुळे पती-पत्नीने परस्पर संमतीने घटस्फोटासाठी केलेला अर्ज न्यायालयाने मंजूर केला. दाम्पत्य मागील दोन वर्षांपासून विभक्त राहत असल्याने न्यायालयाने कुलिंग पिरीअडचा कालावधी वगळत 39 दिवसांत हा निर्णय दिला. याप्रकरणात, दोघांच्या वतीने ॲड. मुकुल विनायक महिंद्रकर यांनी काम पाहिले.
विराज आणि अनामिका (दोघांची नावे बदलली)अशी त्यांची नावे आहेत. तो 30 वर्षांचा तर ती 25 वर्षांची. दोघांचा विवाह 21 नोव्हेंबर 2021 रोजी झाला. लग्नाच्या दोन वर्षानंतर ते एकमेकांपासून विभक्त राहू लागले. भविष्यात एकत्र येण्याची शक्यता नसल्याने दोघांनी परस्परसंमतीने घटस्फोटासाठी अर्ज केला. यावेळी, वकीलासंह समुपदेशक तसेच त्यांच्या कुटुंबियांनी एकमेकांमध्ये समेट घडविण्याचा प्रयत्न केला. दोघेही घटस्फोटावर ठाम असल्याने कोणत्याही प्रकारचा पोटगी किंवा मालमत्तेचा वाद नसल्याचे नमूद करत दोघांनी ॲड. महिंद्रकर यांमार्फत न्यायालयासमोर संयुक्त अर्ज सादर केला होता.
