‘छत्रपती’ घराण्याच्या चार पिढ्यांनी २७ वर्षे औरंगजेबाला झुंजविले – केतन पुरी
पुणे : जगाच्या ८ ते ९ टक्के भूभागावर औरंगजेबाचे राज्य होते. तसंच त्याच्याकडे ३.५ ते ४ लाख इतके सैन्य होते. तरी देखील त्याच्या विरोधात लढा देत छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती राजाराम महाराज आणि ताराराणी साहेब अशा ‘छत्रपती’ घराण्याच्या चार पिढ्यांनी तब्बल २७ वर्षे औरंगजेबाला महाराष्ट्रात झुंजविले. जगाच्या इतिहासात असे एकमेव उदाहरण आहे, असे सांगत लेखक केतन पुरी यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि औरंगजेब यांच्या काळातील समकालीन घटना, दुर्मिळ चित्रे आणि पत्रव्यवहार शिवप्रेमींसमोर उलगडला.
सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे शिवजयंती निमित्त आयोजित शिवमहोत्सवाचे उद्घाटन कै.श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिरासमोरील जय गणेश प्रांगण येथे करण्यात आले. यावेळी श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, सुवर्णयुग तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण, यतिश रासने, सौरभ रायकर, मंगेश सूर्यवंशी, सचिन आखाडे, अमोल चव्हाण, राजाभाऊ घोडके आदी उपस्थित होते.
केतन पुरी म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज आणि औरंगजेब या दोघांच्याही जीवनात अनेक घटना समान आहेत. मात्र छत्रपती शिवरायांची बाजू न्यायाची आणि औरंगजेबाची बाजू अन्यायाची पाहायला मिळते. औरंगजेब आणि शिवरायांनी आपापले शत्रू मारले. मात्र, त्यामागील दोघांच्याही विचारांमध्ये फरक होता. शिवरायांची याबाबतची शिकावं व विचार आदर्शवत आहे.
प्रकाश चव्हाण म्हणाले, दिनांक १९ फेब्रुवारी पर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये शिवव्याख्यान, मृत्युंजय हे महानाट्य, शिवकालीन युद्धकला – मर्दानी खेळाचे प्रात्यक्षिक अशा विविध कार्यक्रमांचा समावेश आहे. उत्सवाच्या पहिल्याच दिवशी दिव्यांगांकरिता मोफत आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये मोफत व्हिलचेअर, ट्रायसिकल, स्वयंचलित हात वाटप करण्यात आले. तसेच दररोज सायंकाळी ७ वाजता व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले आहे.
शिवजयंतीच्या दिवशी गुरुवारी (दि.१९) दुपारी ४ वाजता पारंपरिक वाद्यवादन होणार असून सायंकाळी ७ वाजता शिवसाई प्रतिष्ठान ट्रस्ट निर्मिती गणेश लोणारे व सहकारी प्रस्तुत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावरील मृत्युंजय हे धगधगते महानाटय सादर होणार आहे. सर्व कार्यक्रम शिवप्रेमींसाठी विनामूल्य खुले असून पुणेकरांनी मोठया संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहनही प्रकाश चव्हाण यांनी केले आहे.
