विमानात कोणताही तांत्रिक दोष किंवा बिघाड नव्हता ; व्हिआरएस व्हेंचर्सचा दावा
मुंबई प्रतिनिधी
अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या विमानात कोणताही तांत्रिक दोष किंवा बिघाड नव्हता.’, असा दावा व्हिआरएस व्हेंचर्स या खाजगी विमान कंपनीचे मालक विजय कुमार सिंह यांनी ठामपणे केला आहे. .
अपघात पूर्णपणे वैमानिकांच्या निर्णयामुळे झाला, असे त्यांचे म्हणणे आहे. प्रथम रनवे 29 वर उतरण्याचा प्रयत्न केला पण काही अडचण आल्याने रनवे 11 वर दुसरा प्रयत्न केला आणि त्यावेळी हा अपघात घडला. दृश्यता कमी असल्याने वैमानिकांना रनवे नीट दिसत नव्हता, असेही ते म्हणाले.
विमान चालवणारे मुख्य वैमानिक कॅप्टन सुमित कपूर यांच्याकडे १६ हजारांहून अधिक उड्डाण तासांचा अनुभव होता. त्यांनी यापूर्वी मोठ्या कंपन्यांमध्ये काम केले होते. को-पायलट कॅप्टन शांभवी पाठक यांच्याकडे सुमारे 1500 तासांचा अनुभव होता. सिंह यांनी दोघांनाही खूप चांगले वैमानिक आणि उत्तम माणसे असल्याचे सांगितले. कंपनी मृतांच्या कुटुंबीयांना मदत करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी व्यक्त केले.
नागरी विमान वाहतूक संचालनालयाकडून (DGCA) अपघाताची सखोल चौकशी सुरू झाली आहे. ब्लॅक बॉक्स आणि इतर तांत्रिक तपासणीनंतर अपघाताचे नेमके कारण समजणार आहे.
