ठाकरे गटाने केवळ मुंबई ठप्प करण्याचं काम केलं – केशव उपाध्ये
मुंबई प्रतिनिधी
ठाकरे बंधू सातत्याने उपस्थित करीत असलेले मुंबई, मराठी माणूस’ हे मुद्दे म्हणजे फक्त गप्पा असून त्यात कोणताही आश्वासक शब्द नाही. शिवसेना ठाकरे गटाने केवळ मुंबई ठप्प करण्याचं काम केलं, असा पलटवार भाजपा प्रवक्ते केशव उपाध्येंनी केला. ‘मुंबई आणि मराठी माणसाच्या विकासासाठी प्रत्यक्ष काम केलं ते भाजपाने!’ असं म्हणत ‘विकास करणारे कामातून ओळख पटवतात, बोलघेवडे फक्त घोषणांवर जगतात!’ असा टोलाही त्यांनी लगावला.
शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी शिवतीर्थावरील संयुक्त सभेत सत्ताधाऱ्यांच्या विरोधात टीकेची झड उठवली. भारतीय जनता पक्षाच्या वतीने त्याला जोरदार प्रसिद्ध देण्यात आले.
मुंबईच्या वाहतुकीला गती देण्यासाठी नितीन गडकरी यांनी शहरात 56 उड्डाणपूर उभारले. दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या कार्यकाळात मुंबईतील टोळी युद्ध संपुष्टात आले. गडकरी यांच्यामुळे सी लिंक प्रकल्प आकाराला आला. अटल सेतू, कोस्टल रोड, मेट्रोचे जाळे हे प्रकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने उभारले गेले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला, असे दावे भाजपच्या वतीने करण्यात आले.
दुसरीकडे मुंबई महापालिकेत शिवसेना ठाकरे गटाची सत्ता असताना मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला. उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात कोरोना महासाथीत सर्वाधिक नागरिक बळी पडले. त्यांच्याच कार्यकाळात मेट्रो सारखे अनेक प्रकल्प ठप्प करण्यात आले, असे आरोपही भाजपच्या वतीने करण्यात आले
