‘परीक्षा केंद्रांना सीसीटीव्ही ची सक्ती असेल तर निधी द्या’
शिक्षण संस्थांची राज्य सरकारकडे मागणी
मुंबई प्रतिनिधी
ज्या शाळांमध्ये दहावी आणि बारावीच्या परीक्षांची केंद्र असतील त्या शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची सक्ती करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मात्र, अशी सक्ती करण्यात येत असेल तर त्यासाठीचा निधी देखील शासनाने द्यावा, अशी मागणी शिक्षण संस्थांकडून केली जात आहे. निधी न मिळाल्यास परीक्षा केंद्र रद्द करण्याचा इशारा देखील शिक्षण संस्था देत आहेत.
सीसीटीव्ही कॅमेरे व अन्य यंत्रणा, सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी केलेले चित्र साठवून ठेवणे यासाठी आवश्यक असलेले मनुष्यबळ आणि तांत्रिक प्रणाली यासाठीचा निधी खाजगी आणि अनुदानित शाळांकडे उपलब्ध नाही. त्यामुळे सीसीटीव्ही ची सक्ती असेल तर त्यासाठीचा निधी देखील शासनाने द्यावा, अशी मागणी महामुंबई शिक्षण संस्था या संघटनेने सरकारकडे केली आहे.
अनेक शासकीय शाळा आणि कार्यालयांमध्ये सीसीटीव्ही यंत्रणा पूर्णपणे कार्यान्वित झालेली नाही. अशावेळी सरकारने खाजगी आणि अनुदानित शाळांना सीसीटीव्ही कॅमेरा यंत्रणेची सक्ती करणे म्हणजे आपली जबाबदारी टाळण्यासारखे आहे, असा आक्षेपही शिक्षण संस्थांनी घेतला आहे. शासनाकडून निधी न देता सक्ती कायम ठेवण्यात आली तर परीक्षा केंद्र बंद करण्याचा इशाराही महामुंबई शिक्षण संस्थेच्या बैठकीत देण्यात आला आहे.
