‘काँग्रेस आणि एमआयएम बरोबर युती खपवून घेतली जाणार नाही’
स्थानिक नेत्यांवर कारवाई करण्याचा मुख्यमंत्र्यांचा इशारा
मुंबई: प्रतिनिधी
अकोट नगर परिषदेत सत्ता स्थापन करण्यासाठी ऑल इंडिया मजलीस ए इत्तेहाद उल मुसलमीनशी आणि अंबरनाथ नगरपालिकेत शिंदे गटाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेसबरोबर युती करण्याचा भारतीय जनता पक्षाच्या स्थानिक नेत्यांचा निर्णय अजिबात खपवून घेतला जाणार नाही, हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे. ही युती करणार्या स्थानिक नेत्यांवर पक्षांतर्गत कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
बहुमतासाठी भाजपने अकोट विकास मंच स्थापन केला. या अकोट विकास मंचमध्ये भाजपनंतर सर्वाधिक जागा जिंकणारा एमआयएम, शिंदेंची शिवसेना, ठाकरेंची शिवसेना, अजित पवारांची राष्ट्रवादी, बच्चू कडूंची प्रहार जनशक्ती सहभागी झाली.
या नव्या आघाडीची नोंदणी अकोला जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली. अंबरनाथ नगरपालिकेतही शिवसेना शिंदे गटाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी भाजप आणि काँग्रेसने युती केली आहे. या आघाडी आणि युतीवर राज्य नेतृत्व कमालीचे संतप्त झाले आहे.
काँग्रेस आणि एमआयएमसोबत युती होऊच शकत नाही. स्थानिक पातळीवर जरी हे झालं असेल तर चुकीचचं आहे. ज्याने कोणी ही युती केली असेल त्यांच्यावर कारवाई होईल, असं देवेंद्र फडणवीसांनी खाजगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट केले आहे.
