शिक्षक आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना देणार एक दिवसाचा पगार
शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी दिली माहिती
मुंबई: प्रतिनिधी
राज्यातील सर्व शासकीय शाळांमधील शिक्षक आपला एक दिवसाचा पगार एकत्र करून आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना मदतीसाठी देणार असल्याची माहिती शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी दिली आहे.
राज्याच्या बहुतांश भागात सुरू असलेल्या अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे मोठ्या संकटाला सामोरे जावे लागत आहे. खरीप हंगामातील संपूर्ण पीक पाण्याखाली गेले असून अनेक ठिकाणी जमीन खरडून माती पूर्णपणे वाहून गेली आहे. त्यामुळे शेतीचे कायमस्वरूपी नुकसान झाले आहे. अनेकांच्या घरांमध्ये पाणी शिरल्याने मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.
या संकटात आपत्तीग्रस्तांना दिलासा देण्यासाठी सरकारने 2215 कोटी रुपयांची तरतूद दिली असून प्रत्यक्ष मदत मिळण्यास सुरुवात झाल्याचा सरकारचा दावा आहे. एकूण नुकसानाच्या प्रमाणात ही रक्कम तुटपुंजी असल्याने राज्य सरकारने केंद्राकडे भरीव आर्थिक मदतीची मागणी देखील केली आहे.
या संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील शासकीय शाळांमध्ये काम करणाऱ्या शिक्षकांनी आपली सामाजिक जबाबदारी ओळखून एक दिवसाचे वेतन संकटग्रस्त नागरिक आणि शेतकऱ्यांसाठी देण्याचा अनुकरणीय निर्णय घेतला आहे. यामुळे जबाबदारीचे भान आणि शिक्षकी पेशाचा सन्मान निश्चितपणे वाढला आहे.
