Friday, April 3, 2026
Latest NewsPUNE

बाल हृदयरोग शस्त्रक्रिया सुविधांच्या  उपलब्धतेमुळे पुणे लगत असलेल्या रूग्ण व कुटुंबांना नवी आशा

पुणे : बालहृदयरोग शस्त्रक्रिया सुविधांच्या  उपलब्धतेमुळे पुणेलगत असलेल्या रूग्ण व कुटुंबांना नवी आशा निर्माण झाली आहे. विश्वराज हॉस्पिटल, लोणी येथे परवडणाऱ्या दरात असलेला हा उपक्रम माईर्स एमआयटीच्या विश्वस्त व सहसचिव तसेच विश्वराज हॉस्पिटल लोणीच्या कार्यकारी संचालिका डॉ.आदिती कराड यांच्या नेतृत्वाखाली सुरू करण्यात आला आहे. डॉ.आदिती कराड यांच्या वाढदिवसानिमित्त व विश्वराज हॉस्पिटल ने 50 बाल हृदयरोग शस्त्रक्रियांचा टप्पा पार केल्याच्या निमित्ताने एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. जन्मजात हृदयरोग असलेल्या बालकांच्या कुटुंबियांना यामुळे नवी आशा निर्माण झाली आहे.
 
याप्रसंगी वैद्यकीय संचालक डॉ.सुजित कुमार, सहायक वैद्यकीय अधीक्षक डॉ सचिन कातकडे, बालहृदयरोग तज्ञ डॉ.आशिष बनपुरकर, बालरोग तज्ञ व नवजात शिशु विभागाचे प्रमुख  डॉ.चंद्रकांत सहारे, बालरोग तज्ञ डॉ.अनिल गोस्वामी,कामकाज प्रमुख श्री राजेश पनवर,  मार्केटिंग प्रमुख श्री लोकेश रघुवंशी, मार्केटिंग विभागचे सहाय्यक व्यवस्थापक श्री किरण कुलकर्णी , मेडिकल सहाय्यक सीताराम धस आणि  शिबिर समन्वयक सुरेश शितोळे आदी मान्यवर उपस्थित होते.
 
 विश्वराज हॉस्पिटल, लोणी येथील बालहृदयरोग तज्ञ डॉ.आशिष बनपुरकर म्हणाले की, आम्ही नियमितपणे बारामती,सासवड,लोणंद,फलटण, इंदापूर व पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात मोफत तपासणी शिबिरे आयोजित करत असतो.यामध्ये वैद्यकीय तपासणी,मुल्यांकन,रूग्णांचे आधीचे असलेले मेडिकल रिपोर्टस याची तपासणी करतो.जर एखाद्या बालकाला पुढील तपासणीची गरज असेल तर त्यांना आमच्या रूग्णालयात घेऊन येतो.हृदयरोग प्रक्रियांमध्ये आट्रियल सेप्टल डिफेक्ट (एएसडी) डिव्हाईस क्लोजर,व्हेंट्रिक्युलर सेप्टल डिफेक्ट (व्हीएसडी) अशा सामान्यत: केल्या जाणाऱ्या प्रक्रियांपासून ते डक्टल स्टेंटिंग आणि ट्रान्सकॅथेट्रल फाँटन कम्प्लिशन यासारख्या आधुनिक प्रक्रियांचा समावेश आहे.लहान मुलांमधील हृदयात असलेले जन्मजात रचनात्मक दोष यावर लवकरात लवकर उपचार करणे गरजेचे असते.असे केल्यास त्यांना सामान्य आयुष्य जगता येते.
 
ते पुढे म्हणाले की,आधुनिक कॅथलॅब , बाल हृदयरोग प्रक्रियांसाठी समर्पित शल्यचिकित्सक कक्ष,त्याचबरोबर नवजात शिशु अतिदक्षता विभाग (पीआयसीयू) आणि बालरोग अतिदक्षता विभाग (एनआयसीयूचे) भक्कम पाठबळाच्या आधारे या जीवनदायी प्रक्रिया केल्या जातात.डॉक्टर,परिचारिका,सहाय्यक कर्मचारी आणि वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ते यांच्या सांघिक प्रयत्नांमुळे हा टप्पा पार करता आला.
 
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.गौरी बारवकर व डॉ.कविता शेळके यांनी केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading