जोवर तुमच्यात आत्मविश्वास आहे, तोवर तुम्हाला जगण्याचा अधिकार आहे
कवयित्री, ज्योतिषी, सामाजिक कार्यकर्त्या असलेल्या प्रतिभा शाहू मोडक यांनी दिला आयुष्य जगण्याचा मंत्र
निमित्त होते पुण्यातील हिंदू महिला सभेच्या वतीने आयोजित ‘मी प्रतिभा शाहू मोडक’ या प्रकट मुलाखतीचे. नवी पेठेतील एस एम जोशी सभागृह येथे संपन्न झालेल्या या कार्यक्रमात सुप्रसिद्ध निवेदिका विनया देसाई यांनी मोडक यांची मुलाखत घेतली. हिंदू महिला सभेच्या अध्यक्षा सुप्रिया दामले आणि संस्थेच्या सर्व महिला पदाधिकारी देखील यावेळी उपस्थित होत्या. ‘जैन साध्वी ते सुविद्य पत्नी’ असा प्रतिभा शाहू मोडक यांचा प्रेरणादायी व अनोखा प्रवास यानिमित्ताने उपस्थितांसमोर आला.
मध्यम कुटुंबात झालेला जन्म आणि मुलगी झाल्यानंतर हिरा सोडून दगड हातात आला ही वडिलांची पहिली प्रतिक्रिया यांबद्दल सांगताना प्रतिभा शाहू मोडक म्हणाल्या, “वडिलांना हुंडा द्यावा लागला असता म्हणून मुलगी नको होती पण माझा जन्म झाला. नाळ पुरताना त्या ठिकाणी वडिलांना चांदीच्या नाण्यांचा घडा हाती लागल्याने ते खुश झाले. यानिमित्ताने घरात संपत्ती आली म्हणून माझे नाव शांती ठेवले. पुढे मोठ्या बहिणीला बाळंतपणात झालेला त्रास पाहिला आणि लग्न न करण्याचा निर्णय घेतला. जैन धर्मात एकतर लग्न करून नवऱ्याच्या घरी जा अथवा साध्वी व्हा हेच दोन पर्याय असल्याने मी साध्वी झाले. मात्र तिथे असताना मी स्वत:शीच प्रतारणा करत असल्याचे अनेकदा वाटायचे. शेवटी निर्णय घेतला आणि आश्रमातून बाहेर पडले. पुढे शाहू मोडक यांच्याशी लग्न झाले आणि साध्वी ते पत्नी असा प्रवास अनुभविता आला.”
शाहू मोडक मला कायम त्यांची शक्ती मानायचे, त्यांचे माझ्यावर प्रेम होतेच मात्र ते मला समान दर्जा, मान आणि सन्मान द्यायचे. ते खऱ्या अर्थाने देव माणूस होते. हे मला कायम कोणत्यातरी पुरस्काराहून अधिक मौल्यवान वाटत आले आहे, असे मोडक यांनी आवर्जून सांगितले. मी गेल्यानंतर मुंबई ऐवजी तू पुण्यात रहा. या शहरात तुला आपुलकी, जीवाभावाची माणसे, सामाजिक स्थर्य आणि समाधान मिळेल असा शाहू मोडक यांनी पुणे शहरावर दाखविलेला विश्वास या शहराने या शहरातील अनेक माणसांनी सार्थ ठरविला अशा कृतज्ञ भावना देखील त्यांनी व्यक्त केल्या.
साध्वी म्हणून जीवन जगत असताना आलेले अनुभव, लोकांचे मिळालेले प्रेम आणि पुढे शाहू मोडक यांची पत्नी म्हणून जवळून पाहता आलेली चित्रपट नगरी यांच्या आठवणी देखील त्यांनी सांगितल्या. सुप्रिया दामले यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले तर वंदना जोगळेकर यांनी सूत्रसंचालन केले.
