Thursday, April 16, 2026
Latest NewsPUNE

बुद्ध पौर्णिमेनिमित्त आयोजित ‘तूफानातील दिवे’ कार्यक्रमाने पुणेकर मंत्रमुग्ध

 

विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समिती आयोजित ‘धम्मसंध्या’ कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद

पुणे – सुप्रसिद्ध लोकगायक डॉ. गणेश चंदनशिवे आणि अजय देहाडेंच्या उत्तुंग आणि पहाडी आवाजात प्रस्तुत झालेल्या एकाहून एक सरस अशा बुद्ध-भीमगीतांमुळे बुद्धपौर्णिनेमित्ताने आयोजित धम्म संध्या कार्यक्रमात उपस्थित उपासक-उपासिका  यांना अक्षरशः मंत्रमुग्ध केले.

विश्वभूषण डाॅ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समिती, पुणे, परशुराम वाडेकर , माजी उपमहापौर सुनीता वाडेकर यांच्या पुढाकारातून दीपक म्हस्के यांच्या संकल्पनेतून या धम्मसंध्येचे आयोजन करण्यात आले होते.
सांगीतिकदृष्ट्या अत्यंत दर्जेदार असा हा धम्मसंध्या कार्यक्रम तथागत गौतम बुद्धांच्या जयंतीनिमित्त सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, जनरल जोशी गेट येथील  तथागत गौतम बुद्ध विपश्यना विहारात ‘धम्मसंध्या’ कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरु पराग काळकर, डॉ. विजय खरे, जितेंद्र पानपाटील, सत्यम गाडे यांच्यासह पुण्यातील बुद्धविहारांचे प्रमुख, तसेच राजकीय-सामाजिक क्षेत्रातील मान्यवर मंडळी, अधिकारी, तसेच उपासक-उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते. बुद्धपौर्णिमेनिमित्ताने विहाराला आकर्षक रोषणाई व सजावट करण्यात आली होती.

या वेळी डॉ. गणेश चंदनशिवे आणि अजय दहाडे यांनी उजाड रानी किमया केलीस मोठी, भीमा तुज प्रणाम कोटी-कोटी, गौतम बुद्धांचा संदेश सांगू चला रं, हे भीमराया रामजी तनया, द्यावी मज मती तव गुण गाया, माझ्या भीमाचा प्रसाद उभ्या गल्लीन वाटन, भीम मोत्यांचा हार गं माय, भीम नंगी तलवार गं माय काळजावर कोरल नाव भिमा कोरगाव, पत्रात लिहिते रमा माझी चिंता न करता शिका, गुलामी का टूट गया जाल ये है मेरे भिम का कमाल, अशी एकाहून एक सुरस गीते आपल्या सुमधूर कंठातून सादर केली. त्यांना तेव्हढीच तोलामोलाची साथसंगत वाद्यवृंदांनी केली. सर्व गाण्यांना उपस्थित रसिकांनी हात उंचावून व टाळ्या वाजवून जोरदार दाद दिली.

यावेळी बोलताना डॉ. गणेश चांदनशीवे म्हणाले, सांस्कृतिक राजधानी अशी ओळख असलेल्या पुणे शहरात आंबेडकरी चळवळीतील साहित्यिक, कलावंत यांना व्यासपीठ देण्याचे काम परशुराम वाडेकर यांनी केले आहे. धम्म पहाट, धम्म संध्या आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, सम्यक साहित्य संमेलन, संविधान दौड, संविधान सन्मान संमेलन अशा विविध उपक्रमातून  वाडेकर करत असलेले कार्य कौतुकास्पद आणि आंबेडकरी चळवळीला पुढे घेऊन जाणारे आहे.

कार्यक्रमात उपस्थित सर्व अतिथी व उपासक-उपासिकांना प्रसाद म्हणून खीर वाटप करण्यात आली. अत्यंत सुरेल अशा गायनाने ही धम्मसंध्या उपस्थितांना बुद्ध पौर्णिमेचा एक नवा उत्साह व आनंद देऊन गेली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विश्वभूषण डाॅ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समितीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समितीचे सचिव दीपक म्हस्के यांनी केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading