Operation Sindoor : भारतीय सैनिकांनी पाकमध्ये घुसून ९ दहशतवादी अड्डे केले उध्वस्त केले
पहलगाम हल्ल्याच्या १५ दिवसांनंतर, भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर (पीओके) मधील ९ दहशतवादी तळांवर हवाई हल्ले केले. बुधवारी रात्री १.३० वाजताच्या सुमारास बहावलपूर, मुरीदके, बाग, कोटली आणि मुझफ्फराबाद येथे ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत हल्ले करण्यात आले.
आज सकाळी १० वाजता लष्कराची पत्रकार परिषद-भारतीय लष्कर आज सकाळी १० वाजता ऑपरेशन सिंदूर संदर्भात पत्रकार परिषद घेणार आहे. ही परिषद नवी दिल्लीतील शास्त्री भवन येथे होणार आहे.
ही तीच ठिकाणे आहेत जिथून भारतावर दहशतवादी हल्ल्यांचे नियोजन आणि अंमलबजावणी केली जात होती. पाकिस्तानमधील स्थानिक वृत्तांनुसार, बहावलपूरमधील हवाई हल्ल्यात 30 जणांचा मृत्यू झाला आहे. वृत्तसंस्था एएनआयनुसार, लश्कर आणि जैशचे मुख्यालय उद्ध्वस्त करण्यात आले आहे.
पाकिस्तानच्या इंटर-सर्व्हिसेस पब्लिक रिलेशन्स (ISPR) चे संचालक लेफ्टनंट जनरल अहमद शरीफ चौधरी यांनी सांगितले की, भारताने २४ क्षेपणास्त्रे डागली. वृत्तसंस्था एएनआयने सूत्रांच्या हवाल्याने सांगितले की, पंतप्रधान मोदी रात्रभर ऑपरेशन सिंदूरवर लक्ष ठेवून होते.
भारतीय लष्कराने म्हटले आहे की पाकिस्तानी लष्करी प्रतिष्ठानांना लक्ष्य करण्यात आले नाही. दहशतवाद्यांच्या अड्ड्याला लक्ष्य करण्यात आले आहे. दुसरीकडे, सूत्रांनी एएनआय या वृत्तसंस्थेला सांगितले की, ही एक संयुक्त लष्करी कारवाई होती, ज्यामध्ये भारतीय लष्कर आणि हवाई दलाने एकत्रितपणे अचूक स्ट्राइक शस्त्रे वापरली.
वृत्तसंस्था एएनआयने सूत्रांच्या हवाल्याने सांगितले की, भारतीय लष्कराने पहलगाम दहशतवादी हल्ल्यासाठी जैश-ए-मोहम्मद आणि लष्करच्या अड्ड्यांवर हल्ला करण्याच्या उद्देशाने लक्ष्य निवडले होते.
