Saturday, June 20, 2026
Latest NewsPUNE

समाजात स्व-भान जागे व्हावे, यासाठी ग्रंथाचा प्रकल्प; ज्येष्ठ भाषाशास्त्रज्ञ डॉ. गणेश देवी यांचे प्रतिपादन

 

पुणे: विशिष्ट विचारसरणीचे राजकीय प्रभाव वाढत असताना, ऐतिहासिक वास्तव आणि तथ्य यांच्याशी प्रतारणा होऊ शकते. सध्या इतिहासावर असे अनेक नवे रंग चढवले जात असल्याचे दिसत आहे. समाजात बेभानता वाढत आहे. या पार्श्वभूमीवर, समाजात स्व-भान जागे व्हावे यासाठी ग्रंथाचा प्रकल्प हाती घेतला, असे प्रतिपादन ज्येष्ठ भाषाशास्त्रज्ञ आणि ‘द इंडियन्स’ ग्रंथाचे संपादक डॉ. गणेश देवी यांनी केले. विशिष्ट धर्म, पंथांविषयी कमालीचा विद्वेष वाढला आहे. त्यामुळे अस्वस्थ होऊन जगातील सर्व संस्कृतींच्या ऐतिहासिक पुनर्लेखनाचा संकल्प केला आहे, असेही ते म्हणाले.

मनोविकास प्रकाशनातर्फे प्रकाशित करण्यात आलेल्या द इंडियन्स या मूळ इंग्रजी ग्रंथाच्या मराठी अनुवादाच्या प्रकाशन समारंभात ते बोलत होते. डॉ. गणेश देवी, टोनी जोसेफ आणि रवी कोरीसेट्टर यांनी हा ग्रंथ संपादित केला आहे. ज्येष्ठ पत्रकार आणि विचारवंत कुमार केतकर यांच्या हस्ते भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर येथील नवलमल फिरोदिया सभागृह येथे सदर ग्रंथाचे प्रकाशन संपन्न झाले. इतिहासतज्ज्ञ आणि लेखिका डॉ. श्रद्धा कुंभोजकर, अनुवादक शेखर साठे, प्रमोद मुजुमदार आणि मनोविकास प्रकाशनाचे आशिष पाटकर यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.

डॉ. देवी यांनी ‘द इंडियन्स’ या ग्रंथाच्या निर्मितीची प्रक्रिया आपल्या भाषणातून उलगडली. २०१७ मध्ये केंद्र सरकारने देल्या १२ हजार वर्षांच्या इतिहासाच्या पुनर्लेखनासाठी सांस्कृतिक विभागातर्फे एक समिती नेमली. मात्र या समितीत देशाच्या सर्व भागांना प्रतिनिधित्व नव्हते. एकही महिला सदस्याचा समितीत समावेश नव्हता. ही माहिती समजल्यावर, आपण स्वतः अभ्यासकांची मदत घेऊन तथ्य, वास्तव सांगणारा ग्रंथ लिहावा, संपादित करावा, असा निर्णय घेतला. इतिहासाचा विपर्यास करून, नागरिकांना भ्रमित करून सत्ता काबीज करण्याचे प्रकार जगात अनेक ठिकाणी घडल्याची उदाहरणे आहेत. त्यांचे संदर्भ घेत आम्ही आमची सामाजिक, नैतिक, राजकीय, शैक्षणिक आणि बौद्धिक जबाबदारी पूर्ण करण्याच्या हेतूने एकत्र येऊन, या ग्रंथाची निर्मिती केली आहे. या ग्रंथाच्या तमिळ, मल्याळम, गुजराती आणि हिंदी अनुवादाचे कामही सुरू आहे, अशी माहिती देवी यांनी दिली.

कुमार केतकर यांनी बहुविध अस्मितांच्या, बहुपेडी व गुंतागुंतीच्या समाजवास्तवाकडे निर्देश करीत आणि जागतिक पटलावरील उदाहरणे देत, इतिहासाचे दर्शन घडवले. हिंदुस्थान अखंड म्हणताना पाकिस्तानी, बांग्लादेशी चालणार नाहीत, ही भूमिका कशी घेणार, असा प्रश्न केतकर यांनी उपस्थित केला. भारतीय असे म्हणतानाही आपण मराठी, बंगाली, गुजराती, तमिळी अशी ओळखही जपतोच याकडे त्यांनी लक्ष वेधले. द इंडियन्स हा ग्रंथ वाचकाला ज्ञान, माहिती तर देईलच पण आपल्या इतिहासाचे संदर्भ समजून घेण्यास साह्यभूत ठरेल. आत्मपरीक्षणाला प्रवृत्त करणाऱ्या या ग्रंथाच्या वाचनातून स्वतःची ओळख आणि अस्मिता यांची उत्तरे मिळतील, असेही ते म्हणाले.

डॉ. श्रद्धा कुंभोजकर यांनी द इंडियन्स या ग्रंथाची वैशिष्ट्ये मांडली. ढोबळमानाने दक्षिण आशिया या भूप्रदेशातील मानवी जीवनाचा तथ्य आणि वास्तव मांडणारा आढावा, या ग्रंथात वाचकांना मिळेल. ज्ञानाचे किरकोळीकरण झालेल्या आजच्या काळात इतिहास, पुरातत्त्व, मानववंशशास्त्र, संस्कृततज्ज्ञ अशा अनेकानेक विद्याशाखांत कार्यरत असणार्या अभ्यासक, संशोधकांनी पूर्णतः अॅकॅडमिक शास्त्रशुद्ध व अस्सल साधनांचा वापर करून हे लेखन केले आहे, असेही त्या म्हणाल्या.

डॉ. श्रीकांत बहुलकर यांनी वेदकालीन समाज, धारणा समजून घेण्यासाठी तसेच तत्कालीन मौखिक परंपरेने जतन केलेल्या ज्ञानपरंपरा समजून घेण्यासाठी या ग्रंथाचा उपयोग होईल, असे मत मांडले. अनुवादकांच्या वतीने शेखर साठे यांनी मनोगत मांडले.

प्रकाशकीय मनोगतात आशिष पाटकर यांनी ग्रंथाच्या प्रकाशनामागील भूमिका सांगितली. विज्ञाननिष्ठ ग्रंथांचे जाणीवपूर्वक प्रकाशन आणि पुरोगामी विचारांचे अनुसरण करत असताना तथ्यावर, वास्तवावक आधारित इतिहास मांडला जावा, या भूमिकेतून हा ग्रंथ प्रकाशित केला, असे ते म्हणाले. सुप्रिया चित्राव यांनी सूत्रसंचालन केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading