वैचारिक समरसतेची क्रांती फक्त वारकरी संप्रदायात ह.भ. प. ज्ञानेश्वर महाराज जळकेकर यांचे प्रतिपादन
पुणे : एकमेव महाराष्ट्राच्या मातीतल्या वारकरी संप्रदायाने शैव, शाक्त, गाणपत्य आणि सौर या सर्व पंथाना आपलेसे केले आहे. एकादशी, महाशिवरात्री करुन नवरात्रीचे उपवासही वारकरी करतो आणि सूर्याला अर्घ्यही देतो. त्यामुळे वैचारिक समरसतेची क्रांती फक्त वारकरी संप्रदायात दिसून येते, असे प्रतिपादन ह.भ.प ज्ञानेश्वर महाराज जळकेकर (जळगाव) यांनी केले.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे चातुर्मासानिमित्त आयोजित कीर्तन महोत्सवात ते बोलत होते. स्वारगेट येथील गणेश कला क्रीडा मंच येथे कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
ह.भ.प ज्ञानेश्वर महाराज जळकेकर म्हणाले , वारकरी माहितीच्या ज्ञानाला प्राधान्य देत नाहीत तर ते अनुभवाच्या ज्ञानाला प्राधान्य देतात. ज्ञान प्राप्त झाले की आपला जगाशी संबंध तुटतो. ज्ञान प्राप्त झाले की समाधी प्राप्त होते. सुख देण्याची ताकद फक्त भगवंतात आहे. त्याकरिता आपल्याला त्याच्या निर्विकार लक्षणाची आपल्याला गरज आहे, असेही त्यांनी सांगितले.
ज्ञान हे सुखाचे लक्षण आहे. बुद्धी स्थिर असताना जे ज्ञान प्राप्त होते. ते ज्ञान आपल्या आनंदाला कारणीभूत असते. अध्यात्म ज्ञान सोडले तर इतर ज्ञान भोगाची प्राप्ती करून देते. फक्त अध्यात्माचे ज्ञान त्यागाकडे नेते.
