डिझेल टंचाईचा फटका; कोकणात सुकी मासळी महागली
सिंधुदुर्ग : कोकणात पावसाळ्यापूर्वी सुकी मासळी साठवण्याची लगबग सुरू असताना यंदा मात्र ग्राहकांच्या खिशाला मोठा फटका बसत आहे. आखाती देशांतील युद्धजन्य परिस्थितीमुळे निर्माण झालेल्या डिझेल टंचाईचा परिणाम थेट मासेमारी व्यवसायावर झाला असून, समुद्रात जाणाऱ्या नौकांच्या फेऱ्या कमी झाल्याने बाजारात मासळीची आवक घटली आहे.
रत्नागिरी, खेड आणि सिंधुदुर्गसह कोकणातील विविध बाजारपेठांमध्ये सुकी मासळीचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. विक्रेते आणि ग्राहक दोघेही वाढत्या दरांमुळे चिंतेत आहेत. विशेषतः सोड्यांच्या दराने हजार रुपयांचा टप्पा ओलांडल्याने खवय्यांना मोठा आर्थिक भार सहन करावा लागत आहे.
सध्या बाजारात ढोमा ₹२००, चिवणी ₹३००, कोलिम ₹२००, आंबड काड ₹४००, बोंबील ₹४००, बगी ₹६०० तर सोडे तब्बल ₹१००० प्रति किलो दराने विकले जात आहेत. इंधन टंचाई कायम राहिल्यास आगामी काळात मासळीचे दर आणखी वाढण्याची शक्यता व्यापाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.
