शिक्षणाचा वापर समाजासाठी झाला तरच ते उपयुक्तसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र- कुलगुरू डॉ.पराग काळकर यांचे मत
पुणे : शिक्षणाचा वापर समाजासाठी झाला तरच त्याचा उपयोग आहे. समाजातील कोणताही मुलगा आर्थिक कारणामुळे शिक्षणापासून वंचित राहू नये, हे आपल्या सर्वांचे सामाजिक उत्तरदायित्व आहे. जेव्हा आपण विकसित राष्ट्राकडे वाटचाल करतो, तेव्हा सगळ्यांपर्यंत शिक्षण पोहोचायला पाहिजे. शिक्षणासाठी तुम्हाला मदत करणे शक्य नसेल, तर चांगल्या संस्थांची मदत मिळवून द्या, असे मत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठाचे प्र-कुलगुरू डॉ.पराग काळकर यांनी व्यक्त केले.
शांताई संस्थेच्या वतीने ‘झेप’ या शैक्षणिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन येरवडा येथील शाहीर अण्णाभाऊ साठे सांस्कृतिक भवन येथे करण्यात आले होते. यावेळी तुरुंग उप-महानिरीक्षक (नि.) धनाजी चौधरी , सुरेंद्र पठारे, उद्योजक गुलाम अली महंमद सोमाजी, आयोजक शांताई संस्थेच्या रश्मी कांबळे, महेंद्र (बाप्पू) कांबळे उपस्थित होते.
कार्यक्रमात महिला बचत गटातील कर्तृत्ववान यशस्वी महिलांचा अभिनंदन सोहळा, गुणवंत विद्यार्थांचा कौतुक सोहळा, आदर्श मातांचा सन्मान आणि शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. संतोष देशमुख यांनी विद्यार्थांना करियर मार्गदर्शन केले.
विशेष पोलीस महानिरीक्षक (निवृत्त) डॉ. विठ्ठल जाधव यांना शांताई जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात आले. आध्यात्मिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल बाप्पू पठारे यांना शांताई समाजभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले. महिलांसाठी केलेल्या कार्याबद्दल डॉ. सिमरन जेटवाणी, शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रातील कार्याबद्दल आयुब शेख आणि रवी अगरवाल यांना पुरस्काराने गौरविण्यात आले.
उद्योजक अरविंद बुधाणी, आयएएस अधिकारी सिद्धार्थ किशोर भांगे, शास्त्रज्ञ तनवीर इनामदार यांना शांताई झेप पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच उर्मिला गोसावी व राहुल गोसावी, दिपाली गवळी यांचा विशेष सत्कार करण्यात आला. रश्मी कांबळे यांनी सूत्रसंचालन केले. बापू कांबळे यांनी प्रास्ताविक केले.
