उद्धव ठाकरे हेच मराठा आरक्षणाचे खरे मारेकरी : चंद्रशेखर बावनकुळे
पुणे: माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हेच मराठा आरक्षणाचे खरे मारेकरी आहेत. त्यांना मराठा आंदोलकांना तोंड दाखवायला जागा राहिलेली नाही. त्यामुळेच सकल मराठा समाजाचे शिष्टमंडळ अथवा मराठा आरक्षण आंदोलक यांची भेट घेणे ठाकरे यांनी टाळले, अशी टीका भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी माध्यम प्रतिनिधींशी बोलताना केली.
मराठा समाजाचे आर्थिक आणि सामाजिक मागासलेपण सिद्ध करण्याकडे ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकारने दुर्लक्ष केले. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील युती सरकार प्रमाणे मराठा आरक्षण टिकवण्यासाठी ठाकरे यांच्या सरकारने सक्षम वकिलांची फौज उभी केली नाही. मराठा आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयात अंतिम सुनावणी सुरू असताना ठाकरे सरकार झोपा काढत होते. दोन चांगले वकील देऊन आरक्षणाची बाजू ठामपणे मांडली असती तर मराठा आरक्षण गेले नसते, असा आरोप बावनकुळे यांनी ठाकरे यांच्यावर केला.
ते कधीही आरक्षणाच्या बाजूने नव्हते आणि नाहीत
उद्धव ठाकरे हे यापूर्वी कधीही मराठा आरक्षणाच्या बाजूने नव्हते. आजही नाहीत आणि यापुढेही असणार नाहीत. उद्धव ठाकरे यांना मराठा आरक्षणाशी कधीही देणे घेणे नव्हते आणि आजही नाही. त्यामुळे त्यांना आंदोलकांना तोंड दाखवायला जागा नाही. वास्तविक भेटीला आलेले आंदोलक कोण आहेत, कोणत्या पक्षाचे आहेत, याचा विचार न करता ठाकरे यांनी त्यांना तातडीने भेटणे गरजेचे होते. मात्र, त्यांनी मराठा आंदोलकांची अवहेलनाच केली आहे, अशी टीकाही बावनकुळे यांनी केली.
स्वा. सावरकर हा होऊ शकत नाही निवडणुकीचा मुद्दा
स्वातंत्र्यवीर सावरकरांचा मुद्दा हा भारतीय जनता पक्षासाठी कधीच निवडणुकीचा, राजकीय मुद्दा होऊ शकत नाही. आगामी विधानसभा निवडणुकीला सामोरे जाताना आम्ही डबल इंजिन सरकार महाराष्ट्रातील 14 कोटी जनतेला न्याय देऊ शकेल, असा विश्वास मतदारांमध्ये निर्माण करणार आहोत. इंडी आघाडीचा खोटेपणा आम्ही जनतेसमोर मांडणार आहोत. आमच्याकडे विकास कामांची पुंजी आहे तर त्यांच्याकडे खोट्या कथितांची अर्थात फेक नॅरिटीव्हचे भांडवल आहे, अशी खोचक टीका करतानाच बावनकुळे यांनी महायुती सरकारच्या योजना आणि विकासकामे यासाठी मतदारांकडे मत मागू. त्याचप्रमाणे महाविकास आघाडीला मत देणे म्हणजे महाराष्ट्राचे नुकसान करणे आहे, हे आम्ही मतदारांना पटवून देऊ, असेही सांगितले.
योजना लाभार्थींपर्यंत पोहोचविण्यासाठी जाहिरातींचा खर्च
सरकारी योजनांच्या नावाखाली स्वतःची प्रसिद्धी करण्यासाठी महायुती सरकारकडून जाहिरातींवर कोट्यावधी रुपयांचा खर्च केला जात असल्याची टीका विरोधकांकडून केली जात आहे. मात्र, बावनकुळे यांनी या टीकेचा इन्कार केला. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकार सत्तेवर असताना जाहिरातींसाठी तब्बल 700 कोटी रुपये खर्च केल्याचेही त्यांनी निदर्शनास आणून दिले.
राजकारणात उद्या काय होईल ते सांगता येणार नाही
लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी भाजपला, पर्यायाने महायुतीच्या उमेदवारांना बिनशर्त पाठिंबा जाहीर केला होता. त्याचवेळी विधानसभा निवडणुकीत मनसे महायुतीत सहभागी होईल, अशी चर्चा होती. प्रत्यक्षात, ठाकरे यांनी आपला पक्ष विधानसभेच्या 225 ते 250 जागांवर स्वबळाने लगीन, असा निर्णय नुकताच जाहीर केला आहे. त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना बावनकुळे यांनी, सध्या त्यांनी निर्णय घेतला आहे. मात्र राजकारणात उद्या काय होईल ते सांगता येणार नाही, असे सूचक विधान केले आहे.
