चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग सोमवारपासून बेपत्ता
नवी दिल्ली : चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग हे सोमवारपासून बेपत्ता असून अनेक महत्त्वाच्या कार्यक्रम आणि बैठकांना त्यांचे निकटवर्तीय उपस्थित रहात आहेत. चीनच्या पोलादी भिंतीतून कोणतीही बाब लवकर उघड केली जात नसल्याने जिनपिंग अदृश्य झाल्याबाबत चर्चांना ऊत आला आहे.
जिन्यावरून पडल्याने जिनपिंग यांच्या डोक्याला मार लागला, त्यांच्यावर विषप्रयोग करण्यात आला, ते कोमात आहेत इथपासून त्यांचा मृत्यू झाला, इथर्यंत चर्चा घडत आहेत. मात्र, काही तरी घडले आहे निश्चित याबाबत चीनच्या अभ्यासकांचे एकमत आहे. त्यामुळे त्याचे परिणाम काय होतील, याचीही चर्चा होत आहे.
या पूर्वी देखील एकदा जिनपिंग काही दिवसांसाठी अदृश्य झाले होते. त्यावेळी देखील अफवांचे पेव फुटले. मात्र, त्यावेळी ते पुन्हा प्रकटले आणि कंड्या पिकविनाऱ्यांना त्यांनी नेस्तनाबूत करून टाकले. या वेळी मात्र परिस्थिती वेगळी असून वर उल्लेख केल्याप्रमाणे काहीही घडले असेल किंवा काहीही घडले नसेल तरीही जिनपिंग यांच्या उतरणीची सुरुवात झाल्याचे स्पष्ट होत आहे. दीर्घकाळ दाबून ठेवलेल्या चीन अंतर्गत जिनपिंग विरोधकांना मान वर करण्यास वाव मिळेल असे वातावरण निर्माण होऊ लागले आहे.
मागील महिन्यात स्वतः जिनपिंग यांनी ही बाब सूचित केली आहे. चिनी लष्कराच्या, अर्थात पीपल्स लिबरेशन आर्मीच्या एका कार्यक्रमात त्यांनी लष्कराला यादवी युद्धाला सामोरे जाण्याचे आदेश दिले आहेत. त्याची कारणे चीनच्या पोलादी भिंती ओलांडून जगासमोर आली आहेत.
एकतर चीनची अर्थव्यवस्था सध्या ठप्प आहे आणि या परिस्थितीतून बाहेर पडण्याचा मार्ग जिनपिंग कानी कम्युनिस्ट प्रशासनाला सापडत नाही. चीनमध्ये नुकतेच ‘थर्ड प्लेनम’ चे आयोजन करण्यात आले. त्यातून आर्थिक अरिष्टतून बाहेर पडण्याचा मार्ग दाखवला जाईल, अशी अपेक्षा होती. मात्र, टी विफल ठरली आहे.
चीनमध्ये मोठमोठे उद्योग बंद पडत आहेत. बेरोजगारी वाढत आहे. बँकांची अवस्था बिकट आहे. लोक कर भरण्यास नकार देत आहेत. त्यामुळे कर वसुलीसाठी शहरा शहरातून अनेक ठिकाणी कर वसुली केंद्र उभारण्यात आली आहेत. कर वसुलीसाठी पोलीसच गुंडागर्दी करत आहेत. त्यामुळे जिनपिंग यांच्या विरोधात मोठा असंतोष निर्माण झाला आहे.
जिनपिंग यांच्या विरोधात चिनी लष्करामध्ये देखील मोठ्या प्रमाणात असंतोष आहे. पाकिस्तान प्रमाणेच चिनी लष्कर पूर्वीपासून देशरक्षणा खेरीज अनेक प्रकारचे उद्योग करीत असे. या उद्योगातून मिळणाऱ्या पैशावर लष्कराचे वरिष्ठ अधिकारी बिनदिक्कत डल्ला मारत असत. जिनपिंग यांच्या भ्रष्टाचार विरोधी मोहिमेत लष्कराचे अनेक अधिकारी भरडले गेले. नजीकच्या भूतकाळात जिनपिंग यांनी लष्करातील 40 हून अधिक जनरल दर्जाच्या अधिकाऱ्यांना घरचा रस्ता दाखवला आहे.
याशिवाय जिनपिंग हे स्वतः कधीच लष्करात नसतानाही लष्कराचे सर्वाधिकार त्यांनी आपल्याकडे एकवटून घेतले आहेत. जिनपिंग यांच्या पत्नी लष्करात मेजर जनरल या पदावर कार्यरत आहेत. वास्तविक त्या गायिका आहेत आणि त्यांना लष्कराच्या सांस्कृतिक विभागाच्या प्रमुख म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. लष्कराच्या धोरण निश्चितीत त्यांचा समावेश करण्याचा जिनपिंग यांचा प्रयत्न आहे. हीच बाब चिनी लष्कराला खटकणारी आहे. एका महिलेचे तेही लष्कराची नव्हे तर सांस्कृतिक पार्श्वभूमी असलेल्या महिलेचे आदेश पाळणे लष्कराला मान्य नाही.
अशा अनेक कारणांमुळे चीनमध्ये अस्वस्थता खदखदत आहे. त्यामुळे जिनपिंग यांना काही झाले असले तरी आणि झाले नसले तरीही चीनसमोर आव्हानांचा डोंगर उभा आहे. अशा परिस्थितीत चीनमध्ये यादवी सुरू झाली किंवा अराजक निर्माण झाले तर त्याचे परिणाम काही काळापुरते का होईना, संपूर्ण जगाला भोगावे लागणार आहेत. कोरोना उद्रेकानंतर परिस्थिती बदलत चालली असली तरीही आजही चीन हा जगाच्या पुरवठा साखळीतला कळीचा घटक आहे. युरोप आणि अमेरिकेची बहुतेक पुरवठा साखळी चीनवर अवलंबून आहे. त्यामुळे चीनची परिस्थिती बिघडल्यास काही काळ संपूर्ण जगाला आर्थिक मदीचा सामना करावा लागू शकतो.
मात्र, भारतासाठी ती दीर्घकालीन फायद्याची गोष्ट ठरू शकते. भारत स्वतः मोठी बाजारपेठ आहे. भारतात कुशल कामगार वर्ग उपलब्ध आहे. भारतीय अर्थव्यवस्था विश्वासार्ह आहे. चीनमध्ये अस्थैर्य निर्माण झाल्यास जगभरातील उद्योग अपेक्षेने भारताकडे येऊ शकतात. भारत जागतिक पुरवठा साखळीत महत्त्वाचे स्थान प्राप्त करू शकतो. उत्पादनाचे जागतिक केंद्र बनू शकतो. अर्थात त्यासाठी भक्कम पायाभूत सुविधा, कामगार कायद्यात सुधारणा अशा अनेक बाबी भारतालाही अमलात आणावे लागतील. मात्र त्यासाठी दीर्घकालीन फायदा लक्षात घेऊन विरोधक आणि सत्ताधारी यांनी राजकीय सामंजस्य वाढवून खांद्याला खांदा लावून काम करणे आवश्यक आहे. राजकारणातील हेवेदावे सुरूच राहिले तर ही संधी भारताच्या हातातून निसटल्या खेरीज रहाणार नाही.
