देशाची वाटचाल हुकूमशाहीकडे -उद्धव ठाकरे
नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इंडिया आघाडीने रविवारी (३१ मार्च) दिल्लीतील ऐतिहासिक रामलीला मैदानावर ‘लोकशाही वाचवा’ रॅलीचे आयोजन केले. या रॅलीत काँग्रेसकडून सोनिया गांधी, मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधी उपस्थित होते.
याशिवाय, झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या पत्नी कल्पना सोरेन, दिल्लीचे मुख्यमंत्री अरंिवद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल, शिवसेना प्रमुख (उबाठा) उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे (शरदचंद्र पवार गट) सुप्रीमो शरद पवार, सपा सुप्रीमो अखिलेश यादव, आरजेडीकडून तेजस्वी यादव, टीएमसी नेते डेरेक ओ ब्रेयन आणि डाव्यांकडून सीताराम येचुरी उपस्थित होते. यावेळी उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला.
शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे म्हणतात, आगामी लोकसभेत भाजपचे ४०० जागांचा आकडा पार करण्याचे स्वप्न आहे. पण, आता हीच वेळ आहे, एका व्यक्तीचे आणि पक्षाचे सरकार हद्दपार करावे लागेल. हे सरकार आपल्या देशासाठी धोकादायक आहे. आम्ही सर्वजण इथे निवडणूक प्रचारासाठी नाही, तर लोकशाहीचे रक्षण करण्यासाठी आलो आहोत. ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते, अशा लोकांनाच भाजपने पक्षात सामावून घेतले आहे. भाजपने भ्रष्टाचा-यांना त्यांच्या वॉशिंग मशीनमध्ये धुवून स्वच्छ केले. हा भ्रष्टाचाराने भरलेला पक्ष सरकार कसे चालवू शकतो? असा सवाल उद्धव ठाकरेंनी यावेळी केला.
हा देश हुकूमशाहीकडे वाटचाल करत आहे, आम्ही याच हुकूमशाहीविरुद्ध लढत आहोत. कल्पना जी, तुम्ही काळजी करू नका, आम्ही तुमच्यासोबत आहोत. या दोन बहिणी हिंमतीने लढत असतील, तर आम्ही सगळे भाऊ मागे कसे राहणार. आपल्याला एक संमिश्र सरकार आणवे लागेल, हे संमिश्र सरकारच देशाला वाचवू शकते. भ्रष्टाचार करणारे लोक भाजपमध्ये आणि यांनी अरविद केजरीवाल आणि हेमंत सोरेन यांना आरोपी करुन तुरुंगात टाकले.
या लोकांनी शेतक-यांना दिल्लीत येऊ दिले नाही. शेतक-यांना दहशतवादी मानणारे सरकार पुन्हा येऊ देऊ नका. आता देशात इंडिया आघाडीचे सरकार आणण्याची वेळ आली आहे. यावेळी उद्धव ठाकरेंनी भाजपला थेट आव्हान दिले. ते म्हणाले, भाजपने त्यांच्या पक्षाच्या बॅनवरवर लिहावे, आमचे तीन सहयोगी ईडी, सीबीआय,आयकर विभाग आहेत. मी भाजपला त्यांच्या बॅनरवर हा मजकूर लिहिण्याचे आव्हान देतो. ‘अबकी बार, बीजेपी तडीपार’ अशा घोषणादेखील ठाकरेंनी यावेळी दिल्या.
भाजप नेते आणि माजी केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी इंडिया आघाडीच्या लोकशाही वाचवा रॅलीवोर जोरदार टीका केली. सभा घ्यायला बंदी नाही, पण जमवणारे कोण? जे भ्रष्टाचारात बुडाले आहेत ते…जे जनतेचा पैसा लुटून तुरुंगात गेले आहेत ते…केजरीवाल लालूंच्या पावलावर पाऊल टाकत आहेत. असे भ्रष्टाचारी लोक पीएम मोदींच्या प्रामाणिक सरकारविरोधात एकवटले आहेत. पण, या देशातील जनता त्यांचे ऐकणार नाही. ४ जूनला सर्व काही स्पष्ट होईल, अशी टीका त्यांनी केली.
