सिटीच्या अध्यक्षा आणि मुख्य कार्यकारी अधिकारी जेन फ्रेझर यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट;
मुंबई – सिटीच्या अध्यक्षा आणि मुख्य कार्यकारी अधिकारी जेन फ्रेझर यांनी काल भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत झालेल्या बैठकीत भारताची आर्थिक वाढ, गुंतवणुकीचे परिक्षेत्र तसेच देशाच्या प्रमुख विकास प्राधान्यांना पाठिंबा देण्यासाठी सिटीकडून पुढेही उपलब्ध असलेल्या संधींवर चर्चा केली.
पंतप्रधानांनी विकसित भारत 2047 हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी विकास आणि आर्थिक गतीला वेग देण्याबाबतचे आपले दृष्टीकोन मांडले. चर्चेमध्ये भारतात होणारी गुंतवणूक आणि भांडवली प्रवाह, परदेशातील भारताच्या कॉर्पोरेट क्षेत्रासाठी उपलब्ध संधी, पर्यायी ऊर्जा आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यांसह विविध विषयांचा समावेश होता. भारताच्या आर्थिक धोरणाला अधिक पाठबळ देणे, देशात जागतिक गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यास मदत करणे आणि नव्या बाजारपेठांमध्ये विस्तार करणाऱ्या भारतीय कंपन्यांना जगभरात प्रोत्साहन देणे यासाठी सिटी आणखी कशी मदत करू शकते यावर त्यांनी उहापोह केला. याशिवाय, सौर ऊर्जा आणि हरित हायड्रोजनसारख्या हरित ऊर्जा स्रोतांसह देशासाठी पर्यायी ऊर्जा स्रोतांच्या उभारणीशी संबंधित संधींवरही चर्चा करण्यात आली. चर्चेमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचाही समावेश होता. यामध्ये नियमनाची भूमिका आणि आर्थिक विकासाला पाठिंबा देण्यासाठी तंत्रज्ञानाचा उपयोग करता येऊ शकणारी क्षेत्रे यांवर विचारविनिमय झाला.
या बैठकीत जेन फ्रेझर यांच्यासोबत सिटीचे भारतातील मुख्य कार्यकारी अधिकारी आणि बँकिंग प्रमुख तसेच इंडियन सबकॉन्टिनेंट सब-क्लस्टर प्रमुख के. बालासुब्रमणियन उपस्थित होते. गेली जवळपास 125 वर्षे सिटी भारताला देत असलेल्या पाठिंब्याबद्दल त्यांनी अभिमान व्यक्त केला. देशातील सिटीच्या अलीकडील वाढीबाबत माहिती दिली तसेच देश व ग्राहकांना पाठिंबा देण्याच्या कंपनीच्या दृढ बांधिलकीचाही पुनरुच्चार केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राबविलेल्या सुधारणा धोरणांवर जागतिक वित्तीय संस्थांचा असलेला विश्वास या बैठकीतून प्रतिबिंबित झाला. त्यांच्या महत्त्वपूर्ण उपक्रमांमुळे भारताच्या बँकिंग क्षेत्रात परिवर्तन झाले असून वित्तीय समावेशनाला गती मिळाली आहे.
देशातील आघाडीची आंतरराष्ट्रीय बँक म्हणून सिटी 3 -5 जून 2026 दरम्यान मुंबई येथे आयोजित सिटी इंडिया कॉन्फरन्समध्ये 1,500 हून अधिक ग्राहक आणि गुंतवणूकदारांचे यजमानपद भूषवत आहे. या व्यासपीठाचा उद्देश भारताविषयीचा संवाद अधिक व्यापक करणे आणि जागतिक भांडवलासाठी उपलब्ध गुंतवणूक संधींना अधोरेखित करणे हा आहे.
सिटीला भारतात कार्यरत राहून 2027 मध्ये 125 वर्षे पूर्ण होतील.
