Monday, June 1, 2026
Latest NewsPUNE

भाषेविषयी प्रेम नाही म्हणून अभिजात दर्जा नाही : डॉ. संजय उपाध्ये

पुणे : संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्यासह असंख्य संतांच्या साहित्यातून मराठी भाषेचे अलौकिक सौंदर्य दिसून आले आहे. असे असूनही मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळविण्यासाठी झगडावे लागत आहे, याचे कारण मराठी जनांनाच भाषेविषयी प्रेम नाही, त्यांच्यात एकोपा नाही. सुशिक्षित वर्गाकडून इंग्रजी भाषेला अवास्तव महत्त्व दिले जात आहे तर दुसरीकडे माती आणि शिक्षणाचे नाते तुटले आहे. शिक्षण क्षेत्रातून मराठी भाषेची होत असलेली विटंबना थांबविण्यासाठी, मराठी भाषा टिकविण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची आवश्यकता आहे, असे आग्रही प्रतिपादन प्रसिद्ध गप्पाष्टककार, कवी-लेखक डॉ. संजय उपाध्ये यांनी केले.
मराठी भाषा गौरव दिनानिमित्त मंगळवारी (दि. 27) जय गणेश व्यासपीठ अंतर्गत असलेल्या पुण्यातील जवळपास 50 सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी एकत्रितरित्या मराठी भाषा संवर्धनाबाबत जनजागृती करण्यासाठी डेक्कन जिमखाना येथील स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक येथे मशाली प्रज्वलीत करून मराठी भाषा संवर्धनाची शपथ घेतली. त्या वेळी आयोजित व्याख्यानात डॉ. उपाध्ये बोलत होते. महिंद्रा लॉजिस्टिकच्या सहव्यवस्थापिका योगिता शेटे, डॉ. दीपक रानडे यांची प्रमुख उपस्थिती होती. शिरीष मोहिते, उदय जगताप, पीयूष शहा, अनिरुद्ध येवले, किरण सोनिवाल यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
स्वातंत्र्यपूर्व काळात ज्या ठिकाणी विदेशी कपड्यांची होळी करण्यात आली आणि भाषा शुद्धीसाठी आग्रही असणाऱ्या स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या स्मारकाठिकाणी मराठी भाषेसाठी शपथ घेतली जात आहे, या घटनांचा गौरवाने उल्लेख करून डॉ. उपाध्ये म्हणाले, धर्म, भाषा, राजकारण या पलिकडे जाऊन मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार होण्याची आवश्यकता आहे. मराठी भाषेविषयी आपण गौरवाने बोलत असताना मराठी भाषेची पिछेहाट होण्यात आपल्या काय चुका झाल्या हेही सांगणे तितकेच आवश्यक आहे. मराठी भाषेसाठी महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधी दिल्लीत एकत्र येत नाहीत, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.
वैभव दिघे, हर्षद नवले, मयूर पोटे, राहुल आलमखाने, विक्रम गोगावले, अमर लांडे, मोहनिष सावंत, निलेश पवार, राहुल जाधव, सचिन पवार, उमेश शेवते, मयूर पोटे, सागर पवार, मयूर बोरसे, भाऊ थोरात, विश्वास भोर, सचिन लांडगे, बबलू मायनर या गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पराग ठाकूर यांनी सूत्रसंचालन केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading