मावळमध्ये नदीत बुडून तिघांचा मृत्यू; धोकादायक डोहांपासून दूर राहण्याचे आवाहन
पुणे प्रतिनिधी : मावळ तालुक्यात रविवारी घडलेल्या तीन वेगवेगळ्या दुर्घटनांमध्ये तिघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. उष्णतेपासून दिलासा मिळवण्यासाठी नदीत पोहण्यासाठी गेलेल्या नागरिकांना या दुर्घटनांमध्ये जीव गमवावा लागल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
पहिली घटना शिरगाव-परंदवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बेबडओहळ येथील पवना नदीत घडली. दुसरी दुर्घटना देहू येथील संत तुकाराम महाराज गाथा मंदिराजवळील चार पूल परिसरातील इंद्रायणी नदीच्या डोहात घडली. तर तिसरी घटना तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कुंडमळा परिसरातील इंद्रायणी नदीपात्रात घडली. या तिन्ही घटनांमध्ये प्रत्येकी एका व्यक्तीचा मृत्यू झाला.
नदीतील पाण्याची खोली, प्रवाहाचा वेग आणि डोहांची रचना याचा योग्य अंदाज न आल्याने अशा दुर्घटना घडत असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. उन्हाळ्यात नदी व धरण परिसरात गर्दी वाढत असताना निष्काळजीपणामुळे जीवितहानीच्या घटना वाढत आहेत.
दरम्यान, वन्यजीव रक्षक मावळ, शिवदुर्ग रेस्क्यू टीम तसेच स्थानिक प्रशासनाने नागरिकांना नदी, धरणे आणि खोल डोहांमध्ये पोहण्याचे धाडस टाळण्याचे आवाहन पुन्हा एकदा केले आहे. सुरक्षिततेच्या सूचना दुर्लक्षित केल्यास अशा दुर्घटनांची पुनरावृत्ती होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
