Maratha Reservation : राज्य सरकारला जरांगे पाटलांचा धमकीवजा इशारा
जालना : राज्य सरकारने काल मराठा समाजाला १० टक्के आरक्षण देत असल्याचा ठराव एकामाताने मंजूर केले. यावर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) असहमत असून आज त्यांनी बैठक घेवून मराठा समाजाच्या आंदोलनाची पुढची दिशा स्पष्ट केली. मात्र, यावेळी जरांगे पाटलांनी निवडणुकी आधी कुणबी मराठा आरक्षण लागू करावा, अन्यथा प्रचाराची वाहने ताब्यात घेवू असा, धमकीवजा इशारा राज्य सरकारला दिला आहे.
…अन्यथा प्रचाराची वाहन ताब्यात घेवू
लोकसभेची निवडणूक जाहीर झाल्यावर राज्य सरकार मराठा समाजाला कुणबी गटातून आरक्षण देण्यासाठी चालढकल करेल, अशी भीती जरांगे पाटलांनी व्यक्त केली. तसेच या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने निवडणुकी आधी कुणबी मराठा आरक्षण लागू करावे अशी मागणी त्यांनी केली आहे. अन्यथा प्रचाराची वाहने आंदोलक ताब्यात घेतील असा इशारा राज्य सरकारला दिला आहे.
24 फेब्रुवारीपासून गावात पुन्हा रास्तारोको
ओबीसी गटातून सगेसोयऱ्यांना आरक्षण देण्यासाठी राज्य सरकारला दोन दिवस जरांगे पाटलांनी दिले आहेत. या कालावधीत सरकारने काही हालचाली केल्या नाहीत तर २४ फेब्रुवारीपासून राज्यभरातील सगळ्या गावांमध्ये एकाचवेळी रास्ता रोको करण्याचे आवाहन जरांगे यांनी आंदोलकांना केले आहे.
जेष्ठ नागरिकांना उपोषणाला बसवणार
मनोज जरांगे यांच्या उपोषणामुळे मराठा उपोषणाचा मुद्दा पुन्हा पुन्हा ऐरणीवर येत आहे. तसेच न्यायालयाच्या आदेशानंतर जरांगेना सलाईन लावले गेले. पण आता जर राज्य सरकार आमचे ऐकत नसेल तर या पुढे माझ्यासह जेष्ठ नागरिकांना उपोषणाला बसवणार असल्याचे जरांगे यांनी सांगितले. तसेच उपोषणा दरम्यान जर एखाद्या जेष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला तर त्याला सरकार जबाबदार असेल असे मनोज जरांगे यांनी सांगितले.
