Monday, June 1, 2026
Latest NewsPUNE

गीता भक्ती अमृत महोत्सवाच्या ५ व्या दिवशी श्री धीरेंद्रकृष्ण शास्त्रीजी महाराज यांचे भक्तांना मार्गदर्शन

 

श्री धीरेंद्रकृष्ण शास्त्रीजी महाराज, पूज्य श्री आनंदमूर्ती गुरु मां, आणि इतर प्रमुख संत आणि व्यक्तिमत्व आज महोत्सवाला लाभले.

गीता भक्ती अमृत महोत्सवाचा पाचवा दिवस आदरणीय पाहुणे आणि उत्साही अनुयायांच्या गर्दीने निर्विघ्नपणे पार पडला. विठ्ठल नामाच्या गजरात श्रीमद्भागवत कथेला सुरुवात झाली. “विठ्ठल माझा माझा” या सुरांत सर्व भाविक मंत्रमुग्ध झाले.

आज ज्ञानेश्वरोपासनेत परमपूज्य श्री गोविन्ददेव गिरजी महाराज यांनी ज्ञानेश्वर माऊलींचे स्मरण करत शिष्यांना माऊलींच्या पवित्र शिकवणींचे सखोल ज्ञान दिले.

देवाच्या आळंदीतील ८१ हवनकुंडांचा अभूतपूर्व महायज्ञ हे सध्या सुरु असलेल्या गीताभक्ती अमृत महोत्सवाचे प्रमुख आकर्षण आहे. प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या यजमानांच्या कृपेने समाजाच्या कल्याणासाठी महायज्ञ केला जातो. 2000 हून अधिक वैदिकांच्या मंत्रोच्चारातून निर्माण होणारी कंपने सर्वांसाठीच अद्वितीय अनुभव आहे.

वेदशास्त्र संवादांतून पुन्हा एकदा आपल्या समृद्ध गुरु-शिष्य परंपरेचे दर्शन झाले. वातावरण सकारात्मक ऊर्जेने भरुन गेले. देशभरातील वैदिक विद्वानांनी या चर्चासत्रात सक्रियपणे सहभाग घेत ज्ञानाचा प्रसार करण्याच्या आपल्या प्राचीन परंपरेच्या महत्त्वावर जोर दिला.

जगद्गुरु शंकराचार्य स्वामी श्री विजयेंद्र सरस्वतीजी महाराज, पूज्य श्री आनंदमूर्ती गुरु मां, धर्मरत्न स्वामी श्री गोपालशरण देवाचार्यजी महाराज, पूज्य श्री जीेंतेंद्रनाथजी महाराज आणि भदंत पूज्य डॉ. राहुल बोधीजी यांसारख्या दिग्गजांसह आदरणीय अध्यात्मिक मार्गदर्शक आणि विचारवंतांच्या सन्माननीय उपस्थितीने या कार्यक्रमाला शोभा आली.

श्री धीरेंद्रकृष्ण शास्त्रीजी महाराज यांनी या पवित्र महोत्सवाविषयी आपले मनोगत व्यक्त केले, “मी भाग्यवान आहे की मला आळंदी तीर्थाच्या या पवित्र भूमीवर भगवतांच्या दैवी अस्तित्वाचा अनुभव घेता आला. परमपूज्य गुरुंची उपस्थिती, पवित्र यज्ञ, गौ मातेचे दर्शन आणि मंदिराच्या अध्यात्मिक वातावरणाने माझा दिवस विलक्षण झाला आहे. मी सर्व गुरुंना मनापासून वंदन करतो आणि पूज्य स्वामी श्री गोविन्ददेव गिरजी महाराज यांच्याबद्दल मनापासून कृतज्ञता व्यक्त करतो, ज्यांनी ह्या महोत्सवाच्यानिमित्ताने आम्हाला दैवी तत्वाच्या जवळ नेले आहे.”

परमपूज्य श्री गोविन्ददेव गिरजी महाराज म्हणाले, “गीताभक्ती अमृत महोत्सव हा एक अध्यात्मिक जागृती आणि आत्मज्ञानाचा प्रवास आहे. आळंदीच्या भूमीत, श्रीमद् भगवद्गीतेच्या दैवी शिकवणुकीचे साक्षीदार होणे आणि खऱ्या भक्तीचे सार अनुभवणे हा आपला सन्मान आहे.” बागेश्वर बाबांच्या उपस्थितीबद्दल बोलताना ते पुढे म्हणाले, “श्री धीरेंद्रकृष्ण शास्त्रीजी महाराज यांचे बौद्धिक ज्ञान भाविकांसाठी मार्गदर्शक प्रकाश आहे आणि वैश्विक स्तरावर तरुणांमध्येही या अध्यात्मिक ज्ञानाचे ठसे उमटताना दिसत आहेत.”

राष्ट्रभक्ती संमेलनानंतर, आपल्या राष्ट्राच्या विकासासाठी आणि कल्याणासाठी योगदान देणाऱ्या विशेष व्यक्तींचा सत्कार करण्यात आला. दिवसभर चाललेल्या या उत्सवाची सांगता पूज्य ह.भ.प. श्री पांडुरंगजी महाराज घुले, यांच्या दिव्य संगीतमय कीर्तन संध्येने झाली.

गीता भक्ती अमृत महोत्सवाविषयी

वेद व्यास प्रतिष्ठान आणि गीता परिवार यांनी आयोजित केलेला गीता भक्ती अमृत महोत्सव हा अध्यात्म, भक्ती, समृद्ध भारतीय संस्कृती आणि देशभक्ती यांचा अद्वितीय संगम आहे. या कार्यक्रमात 2000 हून अधिक वैदिक आचार्यांकडून एक दिव्य, अभूतपूर्व भव्य 81 कुंडीय महायज्ञ केला जात आहे. त्याचबरोबर भागवत कथा, हरिकीर्तन, दैवी पवित्र ग्रंथांचे अखंड पठण ऐकायला मिळेल. ४५० हून अधिक कलाकार रामायण आणि भारतीय संत परंपरांवरील महानाट्य सादर करतील. आपला दैवी वैदिक वारसा, समृद्ध भारतीय संस्कृती आणि भक्ती साजरी करण्याचा या महोत्सवाचा उद्देश आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading