Maratha Reservation : सरकारने अल्टिमेटम पाळला नाही, नव्याने आंदोलन उभारणार – मनोज जरांगे पाटील
जालना : राज्य सरकारने मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) आंदोलकांना दिलेला अल्टिमेटम पाळलेला नाही. आम्हाला फेब्रुवारी महिन्याची दिलेली नवीन डेड लाईन आम्हाला मान्य नाही. मराठा समाजाला आरक्षण देणार असताल तर 24 डिसेंबर पर्यंतच द्या. नाहीतर आम्ही पुन्हा नव्याने आंदोलन उभं करू, असा इशारा मराठा समाजाचे आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी राज्य सरकारला दिला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मराठा आरक्षणासाठी फेब्रुवारीमध्ये विशेष आधिवेशन (Special Session) बोलावणार असल्याचे आज हिवाळी अधिवेशनात जाहीर केले. त्यानंतर प्रतिक्रिया देताना मनोज जरांगे पाटील माध्यमांशी बोलत होते.
मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देवून ओबीसी मधून आरक्षण देण्यासाठी गेल्या कित्तेक महिन्यांपासून मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन सुरू आहे. राज्यभरातून मराठा आंदोलनाला पाठिंबा मिळत आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकार कडून मराठा आंदोलकांना आरक्षण देण्यासंदर्भात शब्द दिला, मात्र तो पाळला नाही. त्यामुळे येत्या 24 डिसेंबर पर्यंत आरक्षणा संदर्भात ठोस निर्णय घेतला नाही तर आंदोलन पुन्हा सुरू करावे लागेल, असे मनोज जरांगे पाटील म्हणाले.
पुढे बोलताना जरांगे म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी जी काही घोषणा केली त्यावर आपण काही अंशी समाधानी आहोत, पण पूर्ण समाधानी नाही. सन 1967 पासून ज्यांच्या नोंदी मिळाल्या आहेत. त्याचा लाभ रक्ताच्या नातेवाईकांना मिळणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले आहे. ते एक चांगल झाल. कारण नातेवाईकांना आरक्षण देण्याचं जाहीर केल्यामुळे सर्व मराठ्यांना आरक्षण मिळणार आहे.
