महाराष्ट्रातील सत्ता संघर्ष : विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर यांना सुप्रीम कोर्टा कडून शेवटची संधी
नवी दिल्ली : आमदार अपात्रते बाबत विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर यांनी 30 ऑक्टोबर पर्यंत सुधारीत वेळापत्रक सादर करावे, अन्यथा सुप्रीम कोर्ट विधानसभा अध्यक्षांवर सुनावणीचे वेळापत्रक लादेल. अध्यक्षांना ही शेवटची संधी आहे, असा स्पष्ट इशारा सुप्रीम कोर्टाने आज विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर यांना दिला आहे.
महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षात महत्वाचा मुद्दा असलेल्या बंडखोर आमदारांच्या अपात्रतेबाबाद विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर यांनी अद्यापही निर्णय दिलेला नाही. वर्षभरा पासून नार्वेकर वेळखावूपणा करत असल्याची टीका त्यांवर सर्वच स्तरातून होत आहे. मागील शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी विधानसभा अध्यक्षांच्या कार्यावर अत्यंत कडक शब्दात ताशेरे ओढले आहेत. तसेच आमदार अपात्रतेचे सुधारीत वेळापत्रक सादर करण्यास सांगितले होते. मात्र, आज विधानसभा अध्यक्षांचे वकिल सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी, वेळापत्रकात बदल न करता विधीमंडळाला आपले काम करून द्यावे, असे न्यायालयात सांगितले. यावर सर्वोच्च न्यायालयाने अध्यक्षांना 30 ऑक्टोबर पर्यंत सुधारीत वेळापत्रक तयार करण्यास सांगितले आहे. अन्यथा सुप्रीम कोर्ट विधानसभा अध्यक्षांवर सुनावणीचे वेळापत्रक लादेल. अध्यक्षांना ही शेवटची संधी आहे, असा स्पष्ट इशारा सुप्रीम कोर्टाने आज दिला आहे. तसेच अध्यक्षांनी माध्यमांशी कमी बोलावे असा सल्ला देखील दिला आहे.
सर्वोच्च न्यायालयाने नार्वेकरांवर ओढलेले ताशेरे –
- विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर यांनी 30 ऑक्टोबर पर्यंत सुधारीत वेळापत्रक सादर करावे
- न्यायालयावर हस्तक्षेपाची वेळ आणू नका
- अध्यक्षांनी माध्यमांशी कमी बोलावे
