देशाच्या एकात्मतेसाठी मेरी माटी मेरा देश – जे पी नड्डा
पुणे : देशाच्या एकात्मतेसाठी मेरी माटी मेरा देश हे अभियान राबविण्यात येत असल्याचे मत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी व्यक्त केले.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त पंतप्रधान माननीय नरेंद्र जी मोदी यांच्या आवाहनानंतर देशभरातून ‘मेरी माटी मेरा देश’ अभियान राबविण्यात आले. यानिमित्ताने राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) महाराष्ट्र, आणि नेहरू युवा केंद्र संघटन यांच्या वतीने हजारो विद्यार्थ्यांमार्फत महाराष्ट्रात राज्यभरातील महाविद्यालयांमध्ये हे अभियान राबविण्यात आले. माजी केंद्रीय मंत्री खासदार जे. पी. नड्डा यांच्या प्रमुख उपस्थितीत या अमृत कलशांचे एकत्रीकरण शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय येथे करण्यात आले. या वेळी नड्डा बोलत होते.
नड्डा पुढे म्हणाले, देशाच्या अमृतकाळात पुढील 25 वर्षे महत्त्वाची आहेत. त्या दृष्टीने आपण प्रगती करत आहोत. स्वप्नवत वाटणारे चांद्रयान मोहीम यशस्वी झाली, जी 20 परिषदेतील यश, आफ्रिकन युनियन जी 20 चे कायमस्वरूपी सदस्य, 27 वर्षे प्रलंबित महिला आरक्षणाचे विधेयकाची केवळ दोन दिवसात पूर्तता, अर्थव्यवस्थेत अकराव्या क्रमांकावरून पाचव्या क्रमांकापर्यंत झेप, मोबाईल, खेळणी, वॅक्सिंग निर्मिती अशा विविध क्षेत्रात देश प्रगती करत आहे. आपल्या युवा पिढीला विकसनशील भारताकडून विकसित भारत घडविण्याची संधी आहे. त्यासाठी देशात योग्य वातावरण आहे त्याचा उपयोग करून घेतला पाहिजे.
राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रमुख उपस्थिती होती. असेल.
राज्यातील २४ विद्यापीठांचे कुलगुरू आणि प्रतिनिधी या वेळी उपस्थित होते. अमृतकलशांची मिरवणूक काढत सन्मानपूर्वक त्यांचे प्रमुख पाहुण्यांकडे हस्तांतरण करण्यात आले.
कार्यक्रम स्थळी येण्यापूर्वी नड्डा यांनी संगमवाडी येथील लहुजी वस्ताद यांच्या समाधीस्थळी दर्शन घेऊन या पवित्र स्थानावरील माती कलशामध्ये संकलित केली. महाविद्यालयाच्या आवारातील मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन केले. या परिसरात नड्डा यांच्या हस्ते वृक्षारोपण करून अमृत वाटिका निर्माण प्रकल्पाचा शुभारंभ करण्यात आला.
हा उपक्रम म्हणजे शहीद आणि सीमेवरील सैनिकांना वंदन करण्याचा कार्यक्रम आहे. पुढील २५ वर्षात हा देश वैभवा पर्यंत पोहोचवायचा आहे. राज्यातून दोन कोटी सेल्फी आपल्या घरातील माती सह घेऊन विश्व विक्रम करण्यात येणार आहे. त्यातील 50 लाख सेल्फी उच्च शिक्षण विभाग पूर्ण करेल असा विश्वास पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी व्यक्त केला.
यावेळी बोलताना , हे अभियान प्रत्येक घरात पोहोचविण्यात येत आहे. महाराष्ट्रातून दहा हजार कलश दिल्लीत पाठविले जाणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात आत्मनिर्भर आणि जगातील सर्वोत्कृष्ट देश बनविण्याच्या प्रयत्नात महाराष्ट्राचा महत्त्वाचा वाटा असेल. यातून मोठे अभियान राबविणार आहोत असे मत प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी व्यक्त केले.
राज्यातील 24 विद्यापीठातील सहा हजार महाविद्यालये आणि पाच लाख विद्यार्थ्यांनी शहिदांच्या स्मरणार्थ माती संकलन केले असून ती आज खासदार जे. पी. नड्डा यांच्याकडे सुपूर्द करण्यात आल्याचे राष्ट्रीय सेवा योजनेचे (एनएसएस) राज्य सल्लागार राजेश पांडे यांनी प्रास्ताविकात सांगितले.
डॉ. संजय चाकणे यांनी सूत्रसंचालन केले. कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार यांनी आभार प्रदर्शन केले.
