सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात विद्यापीठस्तरीय सांस्कृतिक स्पर्धा संपन्न
पुणे:- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात रविवार दिनांक २४ सप्टेंबर रोजी मेरी माटी मेरा देश या अभियानांतर्गत विद्यापीठस्तरीय सांस्कृतिक स्पर्धा आणि पुरस्कार वितरण समारंभ संपन्न झाला. राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्थापना दिनानिमित्त विद्यापीठाच्या रासेयो आणि विद्यार्थी विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने नामदेव सभागृहात या सांस्कृतिक स्पर्धेचे व पुरस्कार वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.”या योजनेद्वारे विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या मूल्यशिक्षण आणि स्वयंशिस्तीच्या माध्यमातून त्यांची जडणघडण होत असते. तसेच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यास व राष्ट्रसेवेची भावना वाढविण्यास रासेयो मोलाची भूमिका बजावते” असे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांनी या स्पर्धेच्या पुरस्कार वितरण समारंभाच्या वेळी कौतुक करतांना सांगितले. प्र – कुलगुरू डॉ. पराग काळकर यांनी उपस्थितांना रासेयो स्थापना दिनाच्या शुभेच्छा दिल्या व सर्व स्पर्धकांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी रासेयो राज्य सल्लागार समितीचे सदस्य राजेशजी पांडे, व्यवस्थापन परिषद सदस्य रविंद्र शिंगणापूरकर, बागेश्री मंठाळकर, डॉ संदीप पालवे, डॉ. नितिन घोरपडे, अधिसभा सदस्य प्रसेनजित फडणवीस, राहूल पाखरे, प्राचार्य संजय चाकणे,विविध शैक्षणिक व प्रशासकीय विभागांचे विभागप्रमुख, बिओडीचे संचालक डॉ. अभिजित कुलकर्णी, रासेयो चे तिन्ही जिल्ह्याचे समन्वयक, परीक्षक, स्पर्धक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते. दिनांक ५ ते ११ सप्टेंबर दरम्यान विद्यापीठामार्फत पुणे, अहमदनगर आणि नाशिक या तीन जिल्ह्यात महाविद्यालयीन स्तरावर सांस्कृतिक स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेतून निवड करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांची विद्यापीठ स्तरावरील सांस्कृतिक स्पर्धेसाठी निवड करण्यात आली होती. या निवडक विद्यार्थ्यांची वक्तृत्व, निबंध, भारतीय लोकवाद्य वादन, भारतीय लोकगायन, पथनाट्य, भित्तीचित्र या विविध कलाप्रकांमध्ये ही सांस्कृतिक स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या सर्व स्पर्धेसाठी मेरी माटी मेरा देश, नवे शैक्षणिक धोरण – २०२०, पर्यावरण आणि सहजीवन, लोकसंख्या नियंत्रण विषयक धोरण असे विषय देण्यात आले होते. मराठी, हिंदी, आणि इंग्रजी अशा तीनही भाषेत ह्या स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. तसेच यावेळी स्वच्छताही सेवा या उपक्रमांतर्गत स्वच्छतेची शपथ घेण्यात आली.
या समारंभाचे प्रास्ताविक आणि आभारप्रदर्शन रासेयो चे संचालक डॉ. सदानंद भोसले यांनी केले. डॉ. सविता कुलकर्णी आणि डॉ. शिवाजी पाचर्णे यांनी सूत्रसंचालन केले. २४ सप्टेंबर १९६९ रोजी रासेयो स्थापना दिन असून याला आज ५४ वर्षे पूर्ण होत आहेत. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा तसेच या योजनेतून त्यांचा शारीरिक,मानसिक विकास होऊन तो संवेदनशील नागरिक बनावा आणि यातून राष्ट्रसेवक निर्माण व्हावे असा या रासेयो स्थापनेमागचे उद्दीष्ट आहे.
