Wednesday, June 17, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

देशातील ३ लाख विकास सेवा संस्थांचे बळकटीकरण करणार – केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह

मुंबई : सहकार चळवळीने कालानुरुप स्वत:ला बदलणे आवश्यक आहे. देशात रोजगारनिर्मिती सोबतच आर्थिक विकास वाढविण्याची ताकद सहकार क्षेत्रात आहे. केंद्र सरकारही सहकार विद्यापीठाची स्थापना करुन त्या माध्यमातून बॅंक, दुग्धव्यवसाय, कृषी, विपणन क्षेत्रासाठी प्रशिक्षित मनुष्यबळ निर्माण करणार आहे. ग्रामीण भागातील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांचे बळकटीकरण करण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतला आहे. त्यामुळे सहकार चळवळ ही कालबाह्य होणार नसून या चळवळीचे भविष्य उज्ज्वल आहे, असे प्रतिपादन केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांनी केले.

मुंबई विद्यापीठ आणि सहकार भारती यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी विद्यापीठाच्या फोर्ट येथील कावसजी जहागीर दीक्षांत सभागृहात लक्ष्मणराव इनामदार यांच्या स्मृतीनिमित्त आयोजित व्याख्यानमालेत मंत्री  शाह बोलत होते. यावेळी राज्यपाल तथा विद्यापीठांचे कुलपती रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, विद्यापीठाचे कुलगुरु प्रा. रवींद्र कुलकर्णी, सहकार भारतीचे अध्यक्ष दीनानाथ ठाकूर, राष्ट्रीय महामंत्री उदय जोशी आदी उपस्थित होते.

यावेळी केंद्रीय मंत्री श्री. शहा म्हणाले की, सहकार चळवळ देशासाठी उपयुक्त आहे. देशासाठी अधिक उत्पादन जेवढे गरजेचे आहे,  तेवढेच अधिकाधिक लोकांना रोजगाराची उपलब्धता करुन देणे गरजेचे आहे. सहकार चळवळ ही बाब पूर्ण करु शकते. खऱ्या अर्थाने व्यक्ती हिताचा विचार करणारे हे सहकाराचे मॉडेल असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नवे खाते निर्माण करून सहकार चळवळीत चैतन्य आणले. २०१४ पूर्वी देशातील ६० कोटी लोक बँक व्यवहाराच्या बाहेर होते. त्यांना या परिप्रेक्ष्यात आणले. त्यांना घर, गॅस, वीज, अन्न उपलब्ध करून दिले. आरोग्याच्या सोयी उपलब्ध करून दिल्या. हे लोक आता आर्थिक विकासात भागीदार होऊ इच्छितात. त्यांना आता सहकार चळवळीच्या माध्यमातून देश विकासाशी जोडले जात आहे, असे केंद्रीय मंत्री श्री. शाह यांनी सांगितले.

ग्रामीण विकासाला महत्व देऊन शहरीकरणाकडे वाढणारा ओढा गावातच सुविधा उपलब्ध करुन देत थांबवण्याचा प्रयत्न आता आपण करत आहोत. देशात ३ लाखांहून अधिक विकास सहकारी सेवा संस्था आहेत. आता केवळ एका कामापुरता त्यांचा उपयोग न करता या संस्थांचे संगणकीकरण आणि बळकटीकरण करुन त्यांना नागरी सेवा केंद्राप्रमाणे बहुपयोगी करण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतला आहे. ग्रामीण भागाला सहकाराच्या माध्यमातून समृद्ध करण्याच्या प्रयत्नांसोबतच केंद्र सरकारने नागरी सहकारी बॅंकानाही आता नवीन शाखा, बँक मित्र, मायक्रो एटीएम, कर्ज सुविधा दुप्पट आदी सुविधा देण्यास परवानगी दिली आहे. याशिवाय, नागरी बॅंकाना इतर राष्ट्रीयीकृत बॅंकांप्रमाणेच सेटलमेंट करण्याचा अधिकार दिला असल्याचेही त्यांनी सांगितले.

यावेळी श्री. शाह यांनी सहकार चळवळीचाही आढावा घेतला. सहकार चळवळीने १९०४ पासून वेग धरला. स्वातंत्र्यानंतर सहकार चळवळीने सगळ्यांच्या हिताचा विचार करून चळवळ पुढे नेली. महाराष्ट्रात विठ्ठलराव विखे पाटील, धनंजयराव गाडगीळ, वैकुंठभाई मेहता यांनी ही चळवळ सुरु केली. गुजरातमध्ये श्वेतक्रांतीच्या माध्यमातून आमुलाग्र बदल झाले. राज्याच्या विकासात सहकार चळवळीचा मोठा वाटा असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी त्यांनी सहकार चळवळीचे मार्गदर्शक लक्ष्मणराव इनामदार यांच्याविषयी गौरवोद्गार काढले. महाराष्ट्र ही जन्मभूमी आणि गुजरात कर्मभूमी असलेल्या लक्ष्मणराव इनामदार यांचे नाव आजही गुजरातमधील प्रत्येक गावामध्ये आदराने घेतले जाते. त्यांचा आदर्श ठेवून अनेक कार्यकर्ते तेथे काम करत आहेत.  कोणत्याही सहकारी संस्थेचे पदाधिकारी नसताना त्यांनी केलेले काम अनेकांना मार्गदर्शक असे होते, असे शाह यांनी सांगितले.

राज्यपाल  बैस म्हणाले की, लक्ष्मणराव इनामदार सहकार क्षेत्राचे आधारस्तंभ आणि मार्गदर्शक होते. समाजात आमुलाग्र बदल घडविण्यासाठी आवश्यक बदल सहकार क्षेत्राच्या माध्यमातून घडू शकतील, असा त्यांचा विश्वास होता. कृषी आणि श्वेत क्रांती सहकाराच्या माध्यमातून शक्य झाली आहे. शेतकरी आणि सर्वसामान्यांच्या विकासाचा मार्ग सहकाराच्या माध्यमातूनच जातो. साखर कारखानदारी, दूध व्यवसायाबारोबरच वेगवेगळ्या क्षेत्रात सहकाराच्या माध्यमातून प्रगती होत आहे. सहकारातून राज्यात महाबळेश्वरजवळ उभ्या राहिलेल्या मधाच्या गावाचीही माहिती राज्यपाल बैस यांनी यावेळी दिली. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत  महोत्सवी वर्षात सहकार क्षेत्रातील बदल शेवटच्या घटकाच्या जीवनात मैलाचा दगड ठरेल, असेही त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री  शिंदे म्हणाले की, महाराष्ट्र आणि गुजरातमधील समान धागा म्हणजे सहकार चळवळ होय. त्यामुळे लक्ष्मणराव इनामदार हे या दोन्ही राज्यातील संवादाचा सेतू होते. त्यांनी सहकार चळवळीला व्यापक स्वरूप प्राप्त करून दिले. सहकार क्षेत्रातील लक्ष्मणराव इनामदार यांचे कार्य अनुकरणीय आहे. त्यांच्या कार्याची आठवण म्हणून जिहे कठापूर पाणीपुरवठा योजनेला त्यांचे नाव देण्यात आले आहे. सहकार चळवळीचा सर्वसामान्य नागरिकांना लाभ होण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले, असे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला कुलगुरु प्रा. कुलकर्णी यांनी मान्यवरांचे स्वागत केले.

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading