डाॅ. नरेंद्र दाभोलकरांचे विचार समाजात पेरणे आपले घटनादत्त कर्तव्य- अच्युत गोडबोले
पुणे : डाॅ. नरेंद्र दाभोलकर यांचे विचार सर्वत्र पेरण्याची गरज आहे. ते आपले घटनादत्त कर्तव्य आहे, इथली तरूणांची संख्या फार आश्वासक वाटते, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध लेखक अच्युत गोडबोले यांनी केले. ते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात महा. अंनिस आणि विद्यापीठ विद्यार्थी कृती समिती यांनी संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या नरेंद्र दाभोलकरांचे घरोघरी मालिकेतील १२ पुस्तिकांच्या लोकार्पण समारंभात बोलत होते.
पुस्तिकांचे लोकार्पण मा. कुलगुरु डॉ. सुरेश गोसावी यांच्या हस्ते झाले. ते म्हणाले, विद्यार्थ्यांपर्यंत वैज्ञानिक दृष्टिकोन पोहचला पाहिजे, त्यासाठी माझा कायम पाठिंबा असेल. महा. अंनिस ट्रस्टचे विश्वस्त मा. प्रतापराव पवार हे या कार्यक्रमाचे अध्यक्ष होते. डाॅ. हमीद दाभोलकर म्हणाले, विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये कोणीतरी फार वर्षांपुर्वी लावलेली झाडे, आज आपल्याला स्वच्छ हवा, सावली देत आहेत. तसेच विचांराचे बीज म. फुले- सावित्रीबाई फुलेंनी पेरले, त्यामुळेच आपण आज इथे शिक्षण घेत आहोत. ते विचार पेरण्याची आता आपली जबाबदारी आहे. सावित्रीबाई फुले विद्यापीठात कुलगुरूंच्या उपस्थितीत अधिकृतपणे महा. अंनिसचा पहिलाच कार्यक्रम होत आहे त्याचे मनस्वी समाधान वाटतं.
या समारंभास दोनशेहून अधिक विद्यार्थी होते. सौरभ बागडे यांनी सूत्रसंचालन केले, प्रस्तावित राहूल ससाणे यांनी केले तर आभार सागर नाईक यांनी मानले. राहुल थोरात, राजीव देशपांडे, श्रीपाल ललवाणी, दीपक गिरमे, तुकाराम शिंदे, ओम बोधले आदी या कार्यक्रमास उपस्थित होते.
