भाजपने ९ वर्षांमध्ये ९ सरकारे पाडली खासदार सुप्रिया सुळे संसदेत गरजल्या
नवी दिल्ली : भाजपने ९ वर्षांमध्ये ९ सरकारे पाडली आहेत. देशात राजकारणाचा स्तर घसरला आहे. जुमलेबाजी सुरु आहे. विकासाच्या नावाने बोंब आहे. नोटबंदीनंतर चलनातील नोटांच्या संख्येत वाढ झाली आहे, मोदी सरकारने कोणतीही आश्वासने पूर्ण केलेली नाहीत. सध्या देशामध्ये भाजपकडून तत्त्वहीन पॉलिटिक्स सुरु आहे. पार्टी विथ डिफरन्स कुठे गेले? देशामध्ये यूपीए सरकार असताना मुलभूत गोष्टींच्या किमतींवर नियंत्रण होते. मात्र आज महागाई गगनाला भिडली आहे. आशा शब्दांत खासदार सुप्रिया सुळे यांनी मोदी सरकारचे वाभाडे काढली.
केंद्र सरकारवरील अविश्वास ठरावावर लोकसभेमध्ये चर्चा सुरु आहे. भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी इंडिया आघाडीतील प्रमुख पक्षांवर टीकास्र सोडल्यानंतर सुप्रिया सुळे यांनी निवेदन केले. खासदार सुप्रिया सुळे बोलताना म्हणाल्या की, मोदी सरकार शेतकरीविरोधी आहे. शेतक-यांचे उत्पन्न वाढल्याचे सरकारकडून सांगितले जात आहे, मात्र ते खोटे आहे. कोणत्या शेतक-यांचे उत्पन्न वाढले, ते सरकारने स्पष्ट करावे. कांदा, दूध याबाबत सरकार जागरुक नसून कांद्याची निर्यात केली जात नाही आणि दूध आयात केले जात आहे.
मणिपूर प्रकरणावर बोलताना सुळे म्हणाल्या, मणिपूर हिंसाचाराचे प्रकरण गंभीर आहे. ज्यांची नग्न धिंड काढली. त्या कुणाच्यातरी बहीण होत्या, आई होत्या. सरकारला मात्र मणिपूरचे काही देणेघेणेच नाही असे दिसून येत आहे
पुढे बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेनबद्दल मला काही बोलायचे नाही. ही चांगली गोष्ट आहे परंतु गरीबांच्या ट्रेनचे काय? माझ्या मतदारसंघात तीन रेल्वे स्थानकेआहेत. परंतु एकही रेल्वे थांबत नाही. यूपीएचे सरकार असताना दहा-दहा ट्रेन थांबत होत्या. वंदे भारतला माझा विरोध नाही परंतु गरीबांच्या ट्रेनकडे सरकारने लक्ष देण्याची गरज आहे.
