Wednesday, June 17, 2026
Latest NewsPUNE

“विष्णुमय जग” कीर्तनाच्या निरूपणातून उलगडली संतांची शिकवण

पुणे – देवशयनी अर्थात आषाढी एकादशीनिमित्त लाखो वारकरी श्री विठ्ठल रुक्मिणीच्या नामाचा गजर करत पंढरपुरमध्ये विठ्ठलाच्या दर्शनासाठी दाखल झाले होते. त्याचवेळी पुण्यात आदित्य प्रतिष्ठानतर्फे आषाढी एकादशीनिमित्त आयोजलेल्या संत तुकाराम महाराजांच्या ‘विष्णुमय जग’ अभंगाचे निरूपण गुरुदेव शंकर अभ्यंकर यांनी केले.  गुरुदेव शंकर अभ्यंकर यांनी केलेल्या निरूपणामध्ये सर्व श्रोते न्हाऊन निघाले. यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात हा कीर्तनाचा सांगीतिक सोहळा पार पडला. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी उपस्थित होते. यावेळी अपर्णा शंकर अभ्यंकर लिखित “श्रीविष्णुसहस्त्रनामस्तोत्र” सार्थ आणि सविवरण या ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले.

गुरुदेव शंकर अभ्यंकर म्हणाले की, जसे भगवान विष्णू अंतर्बाह्य सर्वांना व्यापून उरले आहे तसे प्रत्येक वैष्णवाचा धर्म असला पाहिजे. भेदाभेद कुठेहि असता कामा नये. विजातीय, सजातीय, स्वगत असे तीन प्रकारचे भेद असतात. आत्मज्ञानी पुरुषाला भेदाभेद नसते. पायात काटा रुतला की डोळ्यात पाणी येते. शरीराच्या कोणत्याही भागाला इजा झाल्यास त्याची वेदना मेंदूद्वारे सर्व शरीराला जाणवते त्याचप्रमाणे समाजामध्ये, राष्ट्रामध्ये, मानवतेमध्ये कुठेही दुःख उमटलं कि त्याची जाणीव आपल्याला व्हायला पाहिजे. विष्णुमय जग याच्यापेक्षा वेगळे नाही. दुःखावर मात करून सगळ्यांच्या हिताचे काम करता आले पाहिजे. राष्ट्राच्या विनाशाचे नव्हे, हीच शिकवण संतांनी दिली आहे.

गेली ३० वर्षे दर आषाढीला हा कीर्तन सोहळा संपन्न होतो. निरुपणाबरोबर तरुण टाळक-यांचा सहभाग, जितेन्द्र आणि आदित्य अभ्यंकर यांचे अप्रतिम अभंगगायन आणि टाळमृदुंगाच्या घोषात तुडुंब भरलेल्या सभागृहात श्रोत्यांचीही साथ असा हा कार्यक्रम होता. दोन तास रंगलेल्या ‘विष्णुमय जग’ या वारकरी कीर्तनात उच्च विद्याविभूषित तरुण टाळक-यांना साथीला घेऊन शंकर अभ्यंकरांनी श्रोत्यांना भक्तिरंगात न्हाऊ घातले. कार्यक्रमाचे निवेदन डॉ. वंदना जोशी यांनी केले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला संस्थेच्या कार्याची माहिती उपस्थितांना देण्यात आली. टाळकरी आणि विणेकरी यांच्या पंचपदीने  कीर्तनाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर गुरुदेव शंकर अभ्यंकरांनी सेवेचा अभंग सादर केला. कीर्तनाचा शेवट गुरुदेव स्वत: “भैरवी” गाउन करतात. कार्यक्रमाची सांगता विठ्ठलाच्या आरतीने झाली. गेली ३० वर्षे ही कीर्तनसेवा अखण्ड चालू आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading