Tuesday, June 16, 2026
Latest NewsPUNETOP NEWS

Pune : मांदेडे होणार कर्बभाररहीत आणि हवामान बदलांना सकारात्मक प्रतिसाद देऊ शकणारे गाव

–    गोखले इंस्टीट्युटच्या सहकार्याने प्राज इंडस्ट्रीज राबवणार ‘नेट झीरो’ प्रकल्प
–    सुप्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक प्रवीण तरडे होणार उपक्रमाचे ‘ब्रँड अॅम्बॅसिडर’

पुणे  : जैवइंधने व जैव रासायनिक क्षेत्रांमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञान व अभियांत्रिकी सेवा पुरवणाऱ्या जागतिक कीर्तीच्या प्राज इंडस्ट्रीज लिमिटेड या कंपनीच्या संकल्पनेतून, गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्स या संस्थेच्या सहकार्याने पुणे जिल्ह्याच्या मुळशी तालुक्यातील पौड जवळील मांदेडे हे गाव ‘नेट झीरो’ अर्थात कर्बभाररहित आणि हवामान बदलांना सकारात्मक प्रतिसाद देऊ शकणारे गाव म्हणून विकसित करण्यात येणार असल्याची घोषणा प्राजचे संस्थापक व कार्यकारी अध्यक्ष डॉ प्रमोद चौधरी यांनी आज पुण्यात झालेल्या एका पत्रकार परिषदेत केली. सदर उपक्रमासाठी सुप्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक प्रवीण तरडे हे ‘ब्रँड अॅम्बॅसिडर’ असतील अशी माहितीही डॉ चौधरी यांनी दिली. उपक्रमाच्या बोधचिन्हाचे अनावरण देखील यावेळी करण्यात आले.

गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्सच्या सेंटर फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट विभागाचे संचालक डॉ. गुरुदास नुलकर, मांदेडे गावाच्या सरपंच सविता शिवाजी वीर, प्रवीण तरडे आदी मान्यवर या वेळी उपस्थित होते.

या उपक्रमाविषयी अधिक माहिती देताना डॉ प्रमोद चौधरी म्हणाले, “हरितगृह वायूंचा गावपातळीवरील उत्सर्ग कमी करण्यासाठी सातत्याने कृती कार्यक्रम राबवित गावाचा विकास साधण्याच्या हेतूने प्राजने हा उपक्रम हाती घेतला असून या अंतर्गत आरोग्य, ऊर्जा, पाणी, उदरनिर्वाह आणि घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन आदी विषयांवर काम करीत त्यांवर तोडगा काढण्याचा प्राजचा मानस आहे. चालू आर्थिक वर्षापासून सुरु करण्यात येत असलेला हा उपक्रम पुढील दोन वर्षांत पूर्ण होईल. गावाच्या हद्दीतून होणाऱ्या उत्सर्गाचे स्रोत शोधून त्यांना जैवाधारित संपीडित जैववायू (कॉम्प्रेस्ड बायोगॅस – सीबीजी), बायोमोबिलिटी व  बायोप्रिझम या तंत्रज्ञानाच्या आधारे इतर प्रभावी पर्याय उपलब्ध करून देणे आणि पर्यायाने उत्सर्ग कमी करणे यासाठी प्राज प्रयत्नशील असेल. पाणलोट व्यवस्थापन योजना, ऊर्जानिर्मितीक्षम पिकांची लागवड, गावात उभारलेल्या जैवप्रकल्पांसाठीचे पुरवठासाखळी व्यवस्थापन, त्यादृष्टीने अतिरिक्त पिक अवशेषांचे आणि औद्योगिक वापरातील कच्च्या मालाचे व्यवस्थापन यासंदर्भाने देखील गावकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येईल.”

ग्रामीण व कृषी क्षेत्र हे भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा मानले जाते. महानगरांच्या हद्दीवरील गावांमध्ये अलीकडील काळात अमूलाग्र बदल झाले असून, आज ती निमशहरी झाली आहेत. साधनसंपत्तीच्या पारंपरिक व्यवस्थापन पद्धती लोप पावत असून निसर्गसंपदेचे शोषण करण्याची वृत्ती देखील सर्वत्र वाढीस लागली आहे. या जोडीला दुष्काळ, अतिपावसाने अचानक येणारे पूर, दरडी कोसळणे, पिकांची हानी किंवा उत्पादनात घट असे हवामान बदलांच्या दुष्परिणामांनाही गावांना सामोरे जावे लागत आहे. परिणामी शेतीतील रासायनिक खतांचा वापर वाढत आहे, शहरांकडे स्थलांतरांचे लोंढे वाढत आहेत, वनक्षेत्र घटत आहे आणि एकंदरच ग्रामीण अर्थव्यवस्था दुबळी होत चालली आहे. या पार्श्वभूमीवर, गावपातळीवरील हरितगृह वायूंचा उत्सर्ग कमी करणे, संबंधित गाव हवामान बदलांना सकारात्मक प्रतिसाद देईल यासाठी प्रयत्न करून स्थानिक अर्थचक्राला बळ देणे आणि गावकऱ्यांच्या जीवनशैलीतील पर्यावरणपूरकतेला पुन्हा चालना देऊन हवामान बदलांच्या स्वरूपातील त्याचे स्थानिक परिणाम कमी करणे यांची तीव्रतेने निकड जाणवू लागली आहे. हेच लक्षात घेत प्राज इंडस्ट्रीज लिमिटेड या कंपनीच्या संकल्पनेतून आणि गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्स या संस्थेच्या सहकार्याने पुणे जिल्ह्याच्या मुळशी तालुक्यातील मांदेडे हे गाव नेट झीरो (कर्बोत्सर्ग आणि कर्बशोषण समप्रमाणात होईल हे सुनिश्चित करणे अर्थात कर्बभाररहीत) आणि हवामान बदलांना सकारात्मक प्रतिसाद देऊ शकणारे गाव म्हणून विकसित करण्याची ही संकल्पना आहे.

या सर्व उपक्रमांमधून गावातील उदरनिर्वाहाचे स्रोत व संधी वाढतील आणि गाव सोडून शहरांत गेलेले नागरिक अधिक चांगल्या संधी खुणावू लागल्याने गावात परतण्यास उद्युक्त होतील असा विश्वास यावेळी डॉ प्रमोद चौधरी यांनी व्यक्त केला.

यावेळी बोलताना प्रवीण तरडे म्हणाले, “प्राज इंडस्ट्रीजच्या संकल्पनेतून हाती घेण्यात आलेल्या या उपक्रमाने आमच्या मुळशी तालुक्याचे आणि मांदेडे गावाचे नाव हे जागतिक पातळीवर नोंदविले जाईल असा आमचा विश्वास आहे. या नावात नजीकच्या भविष्यात जो विकास होईल, तो अनेक बाबींचा खऱ्या अर्थाने पाया रचणार आहे. आजवर आमच्या तालुक्यात जो विकास आला किंवा जे प्रकल्प आले त्यामध्ये तालुक्याचा सहभाग दिसला नाही. मात्र आता मांदेडे गावाला विश्वासात घेऊन होत असलेले हे काम पथदर्शी ठरेल. प्रत्येक प्रतिथयश कलाकाराने आपापल्या गावाच्या विकासासाठी शक्य तितके प्रयत्न करायला हवेत. ”

प्राज इंडस्ट्रीजच्या वतीने या आधीही गावात अनेक कामे झाली आहेत. आता एक वेगळा दृष्टीकोन घेत होत असलेला हा विकास आमच्यासाठी महत्त्वाचा आहे असे सांगत सविता वीर म्हणाल्या, “सर्वांगीण विकास आणि नेट झिरो उद्दिष्ट साध्य होत असताना स्थानिक पातळीवर नागरिकांचे विशेषतः गावातील महिलांचे अनेक प्रश्न सुटणार आहेत याचा आनंद आहे. गावातील पाणीप्रश्न सोडविण्यासोबतच बाकी अनेक विषयावर आता अभ्यासपूर्ण काम होत असल्याने आम्ही प्राज इंडस्ट्रीज आणि डॉ प्रमोद चौधरी यांचे ऋणी आहोत.”

मांदेडे गावाच्या ऊर्जेच्या गरजा, सध्याची उदरनिर्वाहाची साधने, पाण्याची गरज, पाणलोट क्षेत्राचे नकाशारेखन, घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन आणि हवामान बदलांमुळे उद्भवणारे आरोग्याचे प्रश्न अशा मुद्द्यांवर आधारित प्राथमिक माहिती संकलन सध्या गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्स या संस्थेच्या सहयोगाने सुरू असून नॉलेज पार्टनर म्हणून त्यांचे मिळत असलेले सहकार्य या उपक्रमाला एक नवी दिशा देईल.

उपक्रमाची कार्यचौकट पंचायत समितीच्या सदस्यांसोबत निश्चित करणे, गावकऱ्यांसमवेत अनौपचारिक चर्चा, उपक्रमातील संभाव्य आव्हानांविषयी ग्रामसभेत ऊहापोह, आरोग्य, ऊर्जा, पाणी, उदरनिर्वाह आणि घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन अशा विषयांवरील तोडग्यांविषयीचा ग्रामस्थांचा दृष्टिकोन जाणून घेणाऱ्या कार्यशाळा अशा वेगवेगळ्या मार्गांनी याविषयी आतापर्यंत माहितीची देवाणघेवाण झाली असून गावाची वाडीनिहाय लोकसंख्या आणि समस्या यांची वाडीनिहाय चर्चांमध्ये माहितीही आजवर संकलित करण्यात आली आहे.

गावातील सर्व वयोगट आणि महिलांची मतेही नोंदवली जावीत, असा उपक्रमाच्या या टप्प्यात आवर्जून प्रयत्न केला जात आहे. त्यासाठी हळदी-कुंकू समारंभाचे निमित्त साधून गावातील प्रश्नांवरील संभाव्य तोडग्यांविषयीची महिलांची मते जाणून घेतली गेली आहेत. मुलांसाठी ‘माझ्या स्वप्नातील मांदेडे’ या विषयावर निबंध स्पर्धा आयोजित करून त्यांची मते आणि अपेक्षा जाणून घेतल्या आहेत. प्रकल्पाची दिशा ठरवताना या सर्वांच्या भूमिकांची दखल घेतली जाईल. त्यामुळे प्रकल्पाला सर्वसमावेशक स्वरूप प्राप्त होईल, असे नियोजन या अंतर्गत करण्यात आले आहे.

या उपक्रमा अंतर्गत प्रामुख्याने खालील कामे करण्यावर विशेष भर देण्यात येणार आहे.

जल व्यवस्थापन – पहिल्या टप्प्याचा एक भाग म्हणून, पाणलोट व्यवस्थापनाचा सर्वांगीण दृष्टिकोन समोर ठेवत ‘रिज टू व्हॅली’ पद्धतीचा विचार करून तपशीलवार जल-भूवैज्ञानिक अभ्यास केला जाईल. या अभ्यासातून मिळालेल्या माहितीसह, भूजल पातळीत वाढ करण्याच्या उद्देशाने गावाच्या वरच्या पाणलोटातील माती आणि पाणी या दोन्हींच्या संवर्धनासाठी प्रयत्न केले जातील. याबरोबरच पाण्याची मागणी आणि वितरण व्यवस्थापनावर गावकऱ्यांची मालकी आणि प्रशासन निर्माण करण्यासाठी गावकऱ्यांच्या सहभागाने पाणी समितीही स्थापन केली जाईल.

ऊर्जा संवर्धन – उर्जेची सध्याची गरज, लाकडाचा इंधन म्हणून होत असलेला वापर आणि जीवाश्म इंधन जाळण्यामुळे होणार उत्सर्जन लक्षात घेऊन, गावात हरित ऊर्जेच्या पर्यायांना प्रोत्साहन देत लाकूड आणि जीवाश्म जाळण्यामुळे होणारे उत्सर्जन कमी करणे हा उपक्रमाचा उद्देश आहे. त्याच्या पहिल्या टप्प्यात सुरुवात करण्यासाठी, घरगुती स्तरावर बायोगॅस स्थापित केले जातील. यामुळे इंधन म्हणून होणारा लाकडाचा वापर आणखी कमी होईल आणि स्वयंपाकासाठी लागणारी ऊर्जा आणि गावकऱ्यांच्या इतर गरजा भागवल्या जातील. याबरोबरच गावातील हरित ऊर्जा वाढवण्यासाठीचे पुढील पाऊल म्हणून सौर ऊर्जा वापरून विद्युत गृह उपकरणे चालविली जातील. दररोजच्या वापरातील पाण्याचे पंप आणि विजेची आवश्यकता असलेल्या इतर सुविधा देखील रूपांतरित केल्या जातील. ऊर्जा कार्यक्षमता वाढविण्यासाठी सर्व घरांमध्ये आणि सार्वजनिक जागांवर एलईडी रेट्रोफिट्सचा वापर केला जाईल.

कचरा व्यवस्थापन : शहरांइतका प्रमुख नसला तरी, खेड्यात अव्यवस्थापित घनकचरा ही समस्या आहे, हेच लक्षात घेत कचरा व्यवस्थापन पद्धतींना प्रोत्साहन देऊन काळजी घेतली जाईल. ग्रामस्तरीय कचरा व्यवस्थापन समितीच्या मदतीने ग्रामस्तरीय कचरा व्यवस्थापन यंत्रणा स्थापन केली जाईल.

उपजीविका– शाश्वत जीवनशैलीचा विचार होत असताना हवामान बदल आणि त्याचा उपजीविकेवर होणारा परिणाम या बाबी लक्षात घेत या उपक्रमाद्वारे गावकऱ्यांसाठी कृषी-संलग्न व्यवसायाच्या संधी निर्माण करण्याचा आमचा प्रयत्न असेल. या अंतर्गत खतांचे पॅकेजिंग व मार्केट लिंकेज, बाजरी, तांदूळ आणि आंबा यांसारख्या मूल्यवर्धित कृषी उत्पादनांमध्ये वाढ, दुष्काळ सहन करणाऱ्या पिकांच्या जाती वाढविणे व त्यांची लागवड, बांबू व दुधाचे उत्पादन वाढवणे, प्रशिक्षण सुविधेद्वारे स्वयंरोजगार, बचत गटांना सक्षम करणे आदी बाबीचा देखील यामध्ये अंतर्भाव करण्यात येईल.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading