श्री महालक्ष्मी मंदिरात यज्ञोपवीत उपनयन संस्कार
पुणे : कुर्यात बटो मंगलम्… चे स्वर आणि मंत्रोच्चारांच्या उद््घोषाच्या साक्षीने सारसबागेसमोरील श्री महालक्ष्मी मंदिरात यज्ञोपवीत उपनगर संस्कार पार पडले. तब्बल २० हून अधिक मुले व युवकांवर मंत्रपठण, याग, पूजन अशा पारंपरिक विधींनी उपनयन संस्कार करण्यात आले. अनंत श्री विभुषित जगद््गुरु रामानुजाचार्य झालरीया पीठाधीपती पूज्य श्री श्री १००८ स्वामीजी श्री घनश्यामाचार्याजी महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत हा आध्यात्मिक कार्यक्रम संपन्न झाला.
श्री महालक्ष्मी मंदिर सारसबाग, श्री बन्सीलाल रामनाथ अग्रवाल धार्मिक व सांस्कृतिक ट्रस्ट च्यावतीने यज्ञोपवीत उपनगर संस्कार या आध्यात्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ट्रस्टच्या प्रमुख विश्वस्त अमिता अग्रवाल, संस्थापक विश्वस्त राजकुमार अग्रवाल, भरत अग्रवाल, तृप्ती अग्रवाल, हेमंत अर्नाळकर, अॅड.प्रताप परदेशी यांसह पदाधिकारी व भाविक मोठया संख्येने उपस्थित होते. वेदमूर्ती मिलिंद राहुरकर गुरुजी यांनी पौरोहित्य केले.
घनश्यामाचार्याजी महाराज म्हणाले, परमेश्वर आणि ज्ञान यांच्या जवळ जाण्याकरिता हा संस्कार आवश्यक आहे. गायत्री मंत्रापासून हा संस्कार सुरु होतो. गायत्री मंत्रामध्ये तीन चरण आणि २४ अक्षरे असतात. उपनयन संस्कार झालेल्यांनी ६४ कला आणि ३२ विद्या शिकण्याचा प्रयत्न करायला हवा, अशी धारणा आहे. बदलत्या जीवनशैलीमध्ये या संस्काराच्या वयोमर्यादेच्या कालावधीमध्ये देखील बदल झाले आहेत. मात्र, लहान वयातचा मुलांवर हा संस्कार होणे अत्यंत आवश्यक आहे.