Tuesday, June 16, 2026
Latest NewsPUNE

लोकसहभागातून आळंदीत शंभर खोल्याची इमारत उभारण्यात येणार – चंद्रकांत पाटील

पुणे : अनेक वारकरी बांधवांची इच्छा असते की, आपला अंतिम काळात श्रीक्षेत्र पंढरपूर किंवा आळंदी येथे व्यतित करावा. त्यामुळे अशा वारकरी बांधवांसाठी सुखात राहता यावं; यासाठी लवकरच लोकसहभागातून आळंदीत शंभर खोल्याची इमारत उभारण्यात येणार असल्याची माहिती चंद्रकांतदादा पाटील यांनी दिली आहे. आषाढी वारीनंतर चंद्रकांत वांजळे गुरुजींच्या उपस्थित भूमिपूजन करुन, सदर इमारतीच्या कामाची सुरुवात करण्यात येईल अशी घोषणा देखील आज त्यांनी केली.

वारकरी संप्रदायाची एक महत्वाची परंपरा म्हणजे वारीची परंपरा. येत्या काही दिवसातच आषाढी वारीला सुरुवात होणार असून कोथरूड परिसरातून देखील मोठ्या प्रमाणावर दिंड्या पंढरपूरसाठी रवाना होणार आहेत.तत्पूर्वी कोथरूड परिसरातील दिंड्यांना आणि भजनी मंडळांना पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली वारीसाठी उपयोगी साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी संत पूजनाचा सोहळा देखील पार पडले.याप्रसंगी 15 दिंडयाचे प्रमुख, भजनी मंडळ आणि प्रचंड मोठ्या प्रमाणात वारकरी बांधव उपस्थित होते.

ह. भ. प. भाऊ महाराज परांडे, ह.भ.प. चंद्रकांत महाराज वांजळे, अनंत (बाप्पू )सुतार अध्यक्ष ,सिद्धिविनायक सेवा ट्रस्ट, साई एज्युकेशन ट्रस्टचे सागर शेडग सर,शैलेश जाधव,अध्यक्ष, विठ्ठल मित्र मंडळ आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना पाटील म्हणाले, आषाढी वारीचे महत्त्व सर्वांना समजावून सांगण्यासाठी यंदाच्या आषाढी वारीदरम्यान तुकाराम महाराजांच्या जीवनावर आधारित उत्तम नाट्यप्रयोग पालखीच्या मुक्कामाच्या ठिकाणी होणार आहेत. याचे २४ प्रयोग होणार असून, नाट्यप्रयोगादरम्यान पालखीच्या ठिकाणी स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले जाणार आहेत. त्याचा पहिला प्रयोग श्री क्षेत्र देहू येथे होणार असल्याची घोषणा त्यांनी यावेळी केली.

संयोजक गिरीश खत्री म्हणाले,आज चंद्रकांत दादा पाटील यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली वारकऱ्यांची सेवा हे कर्तव्य मानून “संतपुजन व वारकरी मंडळांना विशेष वारीसाठी उपयोगी साहित्य वाटप” टाळ, मृदंग, वीणा, तंबू, रेनकोट, बॅग या साहित्याचे वाटप आज होत आहे. या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्रास वारकरी संप्रदायाचा थोर वारसा आहे. आमचे वडील आम्हाला कायम सांगायचे की साधु संत येती घरा, तोचि दिवाळी दसरा. आज खोरोखरचं दिवाळी दसरा असल्याची प्रचिती येत आहे.ही सेवा करण्याची संधी उपलब्ध करून दिल्याबाबत दादांचे आभार.

या सोहळ्याच्या सुरुवातीला ह. भ. प. चंद्रकांत महाराज वांजळे यांचे अतिशय श्रवणीय असे कीर्तन पार पडले.यावेळी ते म्हणाले, मालक, चालक हे ज्या प्रमाणे महत्वाचे असतात त्याप्रमाणे पालक देखील महत्वाचे असतात. आज हा लॉन्स म्हणजे पंढरीचे वाळवंट असल्याची अनुभूती दादा आणि गिरीश खत्री यांच्यामुळे येत आहे. चंद्रकांतदादांनी वाटप केलेल्या या साहित्याचा निश्चितच वारकऱ्यांना उपयोग होईल असे ते म्हणाले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading