Saturday, June 6, 2026
Latest NewsPUNE

उपदेशापेक्षा मुलांशी संवाद साधा – योगगुरु डॉ. संप्रसाद विनोद

पुणे : आजी आजोबांना वृध्दाश्रमात ठेवायचे आणि मुलांना संस्कार वर्गात घालायचे असे विचित्र चित्र आज समाजात दिसत आहे. मुले आपल्या पालकांकडे बघून शिकत असतात आणि हे संस्कार दिर्घकाळ टिकतात. मुलांचे भावविश्व समजून घेतले तर त्यांच्यावर संस्कार करावे लागणार नाही तर ते आपोआप रुजतील. त्यासाठी मुलांना वेळ द्या, सतत उपदेश देण्यापेक्षा मुलांशी संवाद साधा, असे मत आंतरराष्ट्रीय ख्यातीचे योगगुरू डॉ. संप्रसाद विनोद यांनी व्यक्त केले.

श्रुतीसागर आश्रम फुलगांव पुणे संचलित कसबा संस्कार केंद्राच्या ३८ व्या वर्धापनदिनानिमित्त सदाशिव पेठेतील उद्यान प्रसाद कार्यालयात कसबा कार्य गौरव पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. यंदाचा पुरस्कार सामाजिक कार्यकर्ते सारंग सराफ, अष्टपैलू कलाकार वसुधा वडके आणि गायिका समृद्धी पटेकर यांना प्रदान करण्यात येणार आला. यावेळी श्री देशमुख महाराज फाऊंडेशनचे प्रमुख प.पू. गुरुदास देशमुख महाराज,अॅड. प्रताप परदेशी, योगेश समेळ, सीमा सरदेशपांडे, प्रल्हाद गवळी, कसबा संस्कार केंद्राचे प्रमुख संयोजक अनिल दिवाणजी, अनघा दिवाणजी आदी उपस्थित होते.

शाल, श्रीफळ, सन्मानपत्र, सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते. कार्यक्रमात कसबा गौरव पुरस्कार नृत्यांगना हर्षदा बांदल आणि खेळाडू प्रांजल पोटफोडे यांना प्रदान करण्यात आला. तर, बालगौरव पुरस्कार कलाकार ईशान जबडे याला देण्यात आला. संस्कार केंद्राची माहिती देणाऱ्या नविन पत्रकाचे प्रकाशन करण्यात आले. तसेच स्वाधार संस्थेतील देवदासींच्या मुलांना शैक्षणिक साहित्याची मदत करण्यात आली. पुरस्कार वितरण समारंभानंतर विविध स्पर्धांचा पारितोषिक वितरण समारंभ आणि संस्कार वर्गातील ७५ मुला-मुलींच्या सांस्कृतिक कार्यक्रमात समूहनृत्य व समूहगीत सादर केले.

प.पू. गुरुदास देशमुख महाराज म्हणाले, आज स्पर्धेच्या युगात मुलांना केवळ शिक्षण देवून चालणार नाही तर त्यांच्यावर चांगले संस्कार देखील करणे गरजेचे आहे. त्यासाठी आपल्या मुलांबरोबर चांगले नातेसंबध प्रस्थापित करा. आज अनेक शिवबा जन्माला येत असतील परंतु त्यांना घडविणाऱ्या जिजाऊंचा अभाव दिसत आहे. ज्या देशात संस्कारांचा पाया मजबूत असेत ते सक्षम राष्ट्र असते, असेही त्यांनी सांगितले. स्मिता जोशी, संगिता जयंत ठकार, प्रिती  नायकवडी, अपेक्षा राऊत, सोनाली खानगांवकर, सारिका पाटणकर, यशवंत पारखी, रुपेश कुलकर्णी हे मान्यवर देखील उपस्थित होते. सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन पूर्वा ढोले, आर्या परदेशी, दिव्या राऊत यांनी केले होते.अनघा दिवाणजी व चैताली सरमहाले यांनी सूत्रसंचालन केले. अनिल दिवाणजी यांनी प्रास्ताविक केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading