आई,वडील आणि जिद्द हीच तरुणांची संपत्ती उद्याेजक लहुजी शेलार यांचे मत
पुणे : तरुणांमध्ये खूप ऊर्जा असते त्याचा वापर नोकरी करण्यापेक्षा व्यवसाय करण्यासाठी त्यांनी करावा. व्यवसाय करताना प्रत्येकालाच अपयश येते. यशाला भागीदार असतात. पण अपयशाला केवळ तुम्हीच जबाबदार असतात. आई, वडील आणि जिद्द हीच तरुणांची संपत्ती आहे. कष्ट केले तरच प्रतिष्ठा मिळेल, असे मत उद्योजक लहूजी शेलार यांनी व्यक्त केले.
समाजभूषण बाबुराव उर्फ आप्पासाहेब जेधे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या वतीने उद्योजकता विकास कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यशाळेचे उद्घाटन लहूजी शेलार यांच्या हस्ते झाले. यावेळी महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य डॉ. दिपाली आर. पाटील, डॉ. अशोक मोजाड, वाणिज्य विभाग प्रमुख डॉ. एल.जी रेटवडे, डॉ.दादाराव इंगळे, डॉ. के.डी. गारगोटे उपस्थित होते.
लहुजी शेलार म्हणाले, व्यवसाय करताना व्यवसाय काय आहे हे समजून घ्या. संलग्न व्यवसाय करा व्यवसायात सातत्य ठेवा त्यातील बारकावे समजून घ्या. वचनबद्धता गुणवत्ता आणि प्रमाण याचा परिणाम व्यवसायावर होतो, असेही त्यांनी सांगितले. व्यवसाय करायला सुरुवात केल्यावर लगेचच यश मिळेल असे नाही. त्यासाठी मेहनत आणि जिद्द आवश्यक आहे.
दिपाली पाटील म्हणाल्या, कोणतेही काम करीत असताना, अपयश आले म्हणून खचून जाऊ नका. प्रयत्नांमध्ये सातत्य ठेवा आणि स्वतःवरचा विश्वास अटळ ठेवा. तरुण वयात आपली गुंतवणूक ही पैशात नाही तर वेळेत करायला हवी. तुमचा वेळ कुठे खर्च होतो यावर तुमचे भविष्य अवलंबून आहे. डाॅ.अमित गोगावले यांनी सूत्रसंचालन केले. दीपक सुरवसे यांनी आभार मानले.
