कृत्रिम बुद्धीमत्ता माणसाची जागा घेऊ शकत नाही
शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर आजीवन शिक्षण व विस्तार विभागाचे संचालक रामचंद्र पवार ; ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित तंत्रज्ञान व अनुप्रयोग’ यावर परिषद
पुणे : एआय हे फक्त सॉफ्टवेअर नसून ज्ञानाचा मोठा सागर आहे. त्याचा योग्य वापर करण्यासाठी योग्य प्रश्न विचारणे आवश्यक आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता कितीही विकसित झाली तरी प्रत्यक्ष अंमलबजावणीसाठी माणूसच आवश्यक राहणार आहे, असे मत शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर आजीवन शिक्षण व विस्तार विभागाचे संचालक डॉ. रामचंद्र पवार यांनी व्यक्त केले.
स्व. उद्धवराव तुळशीराम जाधवर फाउंडेशन संचलित प्राचार्य डॉ. सुधाकरराव जाधवर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय आणि डॉ. सुधाकरराव जाधवर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड टेक्नॉलॉजी यांच्या वतीने “कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित तंत्रज्ञान व अनुप्रयोग” या विषयावरील पहिली द्विदिवसीय राष्ट्रीय परिषद संपन्न झाली. यावेळी कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातील तज्ज्ञ सुरेंद्र पनपालिया, डॉ.सचिन भिडे, मनीष पाटणकर आदी उपस्थित होते.
यावेळी याविषयावरील विशेष पुस्तिकीचे अनावरणही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.सुधाकर जाधवर व उपाध्यक्ष ऍड. शार्दूल जाधवर यांच्या मार्गदर्शनाखाली ही परिषद पार पडली.
डॉ. रामचंद्र पवार म्हणाले, एआयमध्ये भावना, संवेदनशीलता आणि मानवी मूल्यांचा अभाव आहे. त्यामुळे एआय माणसाला कधीही पूर्णपणे पर्याय ठरु शकत नाही. उलट मानवी क्षमतांना अधिक सक्षम बनवण्यासाठी ते एक प्रभावी साधन ठरू शकते
डॉ. सचिन भिडे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वामी विवेकानंद यांच्या काळात कृत्रिम बुद्धिमत्ता नव्हती, तरीही त्यांनी जगाला दिशा देणारे महान कार्य केले. आज आपल्याकडे एआयसारखे आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध आहे. त्यामुळे आपण आपल्या क्षमतेपेक्षा अधिक यश संपादन करू शकतो. भविष्यात नोकरीसाठी जाताना एआय-रेडी असलेले विद्यार्थी इतरांपेक्षा वेगळे आणि अधिक सक्षम ठरतील. त्यामुळे विद्यार्थ्यांनी तंत्रज्ञानाची भीती न बाळगता त्याचा अभ्यास करून स्वतःला काळानुसार अपडेट ठेवणे आवश्यक आहे, असेही त्यांनी सांगितले.
