मुंबईवरील दावा खपवून घेणार नाही; देवेंद्र फडणवीस यांनी कानडी मंत्र्यांना ठणकावले
नागपूर : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी तंबी दिल्यानंतर देखील कानडी मंत्र्यांची बडबड सुरूच आहे. कर्नाटकातील उच्च शिक्षण मंत्री सी. एन. अश्वत्थ नारायण यांनी मुंबईला केंद्रशासित प्रदेश जाहीर करा, अशी मागणी केली आहे. तर कर्नाटकाच्या विधान परिषदेचे सदस्य लक्ष्मण सवदी यांनी मुंबई ही कर्नाटकचीच आहे, असा दावा केला आहे. या व्यक्तव्याचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समाचार घेतला. “मुंबई कुणाच्या बापाची नाही, मुंबईवरील दावा खपवून घेणार नाही”, अशा कडक शब्दांत कानड्यांना ठणकावले आहे.
आज विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी हरकतीच्या मुद्द्याद्वारे विधान सभेत कर्नाटकाच्या मंत्री आणि आमदारांच्या विधानांकडे सभागृहाचे लक्ष वेधले. त्यावर फडणवीस बोलत होते.
फडणवीस म्हणाले, केंद्रीय गृहमंत्री व कर्नाटक सरकारला निषेधाचे पत्र पाठविण्यात येईल. केंद्रीय गृहमंत्र्यांकडे झालेल्या बैठकीत नव्याने दावे केले जाणार नाहीत असे ठरले होते. आता मुंबईसंदर्भात कर्नाटक सरकारने केले ते दावे बैठकीतील ठरावाच्या विसंगत प्रकारचे दावे आहेत. सभागृह याचा निषेध करित आहे. याबाबत केंद्रीय गृहमंत्री यांना पत्राद्वारे कळविले जाईल केंद्रीय गृहमंत्र्यांसमोर जे ठरले आहे त्याचे उल्लंघन करणे हे खपवून घेणार नाही, असेही फडणवीस यांनी सांगितले.